पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/५२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाऊन तेथील बाया, लेकरं यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना मदत करतात. पाळणाघर सरकारला काढायला लावलंय. त्या जागेत सायंकाळी वर्तमानपत्रं वाचायला सोय केली आहे. अंकुश घरी येण्यापूर्वी तिथे जातोच. मुंबईत आल्याने जग किती प्रचंड मोठे आहे हे पेपर मधून कळते. मुंबईचीही आता सवय व्हायला लागलीय, हेच खरं. आंजा सोनूला आणायला बालवाडीत गेली की शेजारच्या खोलीतली वर्तमान पत्रे वाचायला चुकत नसे. आसपासच्या बायांना जमवून तिने भिशी सुरु केली होती. महीन्याला दहा रूपये प्रत्येक जण जमा करी. महिन्यातल्या पहिल्या रविवारी सायंकाळी सगळ्या जमत. गप्पा मारीत. बाराजणींच्या नावाच्या चिठ्ठया आंजाने केल्या होत्या. एखाद्या लहान लेकराकडून चिठ्ठी काढली जाई. तिला एकेशवीस रूपये मिळत. मग तिच्या नावाची चिठ्ठी फाडली जाई. या निमित्ताने गावाकडची खबरबात पण कळे. कुणी ना कुणी गावाकडे जावून येई.
 आंजा कामाला जाई त्या कमला दिदी खूप प्रेमळ होत्या. अजमेरजवळ त्यांचे माहेर होते. दादांची नोकरी मुंबईतली ते रोज चर्चगेटला जात. दिदी महिन्यातून चार दिवस स्वयंपाक करीत नसत. मग त्यांनी आंजाला चपात्या नि फलके करायला शिकवले. त्यांना बाळ येण्याची चाहूल लागल्यावर आंजाला चपात्या करायला सांगितले. शंभर रूपये पगार पण वाढला.
 गेल्या सालची पहिली पंचमीतर सुनीच गेली. यंदा पंचमीला भिशीतल्या बायांनी रात्री भुलईचा फेर धरला.

पंचमीचा सण नागोबा वेगीला
मुऱ्हाळी यावा मला, पाठी भाऊ ग मागीला…
वेडा बागडा भाईराया बहिणाला असावा
चार आण्याची चोळी, एका रातीचा विसावा…

 भवतालच्या बायापण जमल्या. त्याही फेरात आल्या. एकीने सासुरवाशी भारजाचे भुलईचे गाणे म्हटले. एक तेलंगणातली प्रौढ अम्मा पुढे आली. तिनेही पंचमीचे वेळी फेरात म्हटले जाणारे गाणे म्हटले. सासू ऐवजी भावजय नणदेला कसे छळते, ठार मारून पुरते त्याची कथा सांगितली. त्या पुरलेल्या ढिगाऱ्यावर रंगीबेरंगी सुंगधी फुले फुलतात. त्या बाईची धाकटी बहिण ती फुले तोडायला जाते तर तिला बहिणीचे गाणे ऐकू येते.


शोध अकराव्या दिशेचा / ५२