पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/३०

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बसे. ऑफिसातून येणाऱ्या बाया किंवा बड्यांच्या बाया त्या नीटसपणे ठेवलेल्या भाज्या घेऊन जात. भायखळ्यात चार दोन रूपये किलोनी मिळालेली भाजी मीनाबाईच्या हातगुणामुळे, कष्टामुळे पंधरावीस रूपयापर्यंत विकली जाई. आंजाने तर इतक्या ताज्या नि तऱ्हेतऱ्हेच्या भाज्याच पाहिलेल्या नव्हत्या. आंज्याच्या घरी लक्ष्म्या येत तेव्हा त्यांना भाकरी आणि रानातली भाजी लागे. तेव्हा तांदुळ कुंजराची भाजी न्हाईतर चंदनबटवा शोधताना किती धांदल उडायची. इथल्या मार्केटात तर किती तऱ्हेतऱ्हेच्या पालेभाज्या असतात. तऱ्हेतऱ्हेच्या मिरच्या, वांगी, भेंड्या, शेंगाचे सतरा प्रकार, आणि भाजी विकणारेही लक्ष्म्यापुढे आरास मांडतात तशा त्या भाज्या निटुसपणे मांडून ठेवतात.
 दिवस उलटत होते. मुंबईतली गर्दी आंजाला आता बोचेनाशी झाली. तिथला गोंगाट आणि झगमगाट याचीही सवय झाली. पण दोन गोष्टी मात्र अगदी नकोशा वाटत, आंघोळ… इराकतीला बसण्यासाठी आडोसा नाही आणि संडास म्हणजे उघड्यावर. ती पहाटे उठून आडोसा पाहून येई. घराच्या मागे तरंट लावून फरशी टाकून आंघोळीलाही आडोसा केला होता. घरा जवळच एक पाळणाघर होते. फी बरीक पंचवीस रूपये होती. पण सांभाळणारी बाई शिकलेली, नीटस होती. तिने सोनू झाली तेव्हाच पक्के ठरवून टाकले होते. सोनूला खूप खूप शिकवायचे. कितीही कष्ट करून चार पैसे साठवायची उमेद तिच्यात होती. मीनाबाईच्या ओळखीने जवळच्या इमारतीतल्या नोकरी करणाऱ्या बायांकडे कामही मिळाले. झाडू पोछा नि धुणी भांडी करण्यासाठी दिडशे रूपये मिळत. चार घरचे काम मिळाले होते. तिची टापटिप, झटपट पण नीट काम करण्याची पध्दत सर्वानाच आवडे, सोनूला आठ वाजता पाळणा घरात सोडून ती कामाला जाई. एक वाजता परत येतांना तिला घरी घेऊन येई. पहाता पहाता आंजा, अंकुश दोन महिन्यात मुंबईकर बनले. पण तरीही आंजाला गावाकडचे सण आठवत. ज्येष्ठ आषाढातली झाडाची पूजा, आषाढ तळणे, भाद्रपदातील लक्ष्म्यांची धांदल, पुसातले रविवार, दिवाळीतलं शेणाच गोकूळ मांडण… सार सार आठवे. अंकुशाच्या स्वप्नात भेगाळलेली जमीन… उदास रान येई … लंगड्या काकांचे आशेने वाट पाहणारे डोळे येत.



शोध अकराव्या दिशेचा / ३०