पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/२६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यानुसार तिच्या आन्नांनी आंजाची शाळा बंद केली. चांगल्या मार्कानी दहावीत गेलेल्या आंजनीचे लगीन दगडवाडीच्या अंकुश देशमुखाबरोबर लावून दिले. अंकुशा बारावीपसवर शिकलेला होता. तीन बहिणीतला एकटा भाऊ, मोप, धा एकर जमिनीचा मालक, पण जमीन दगडगोटयांनी भरलेल्या उतराची पावसाच पाणी दरा दरा वाहून गडप व्हायचं. तसल्या जमीनीत पीक तरी कोणतं येणार? पिवळी जवारी, थोडेफार उडिद, तीळ, आंजाला इतिहासातली पानं आठवली. त्यात लिहिलं आहे, मानवाने नदीचा काठ पाहून वसाहती केल्या. पाण्याला संस्कृत भाषेत 'जीवन' असे म्हणतात. ते आठवून हंसूही आलं. हे 'जीवन' पाणी दगडवाडीत होतं? कदाचीत फार फार पुर्वी निळाई दुथडी भरून वाहतही असेल पण आज?....
 बरोबरच्या बाया दोन दोन तांब्यात न्हाऊन माघारी आल्या होत्या. लेकरांनाही पाणी ओतू ओतू खंगाळून घेतले होते.

 "आंजे, आग जा की, मी बघती सोनू कडे. आत्ता येतील गडी माणसं माघारी. आणि हये बघ. सकाळच्या पारी आंगुळ करणाऱ्या बायाकडे बघाया येळ नसतो हितल्या गडीमाणसांना. उद्या मुक्कामावर गेल्यावर घोटभर पाण्यासाठी कसं तरसावं लागतं ते कळेल. करून घे आंगुळ. हितं लाज डोक्याले गुंडाळावी लागते. ममई आहे ही. जा." शिवादादाची मुंबईतली कारभारिण ठसक्यात सांगत होती. गडी माणसं बाहेर गेल्यावर ही इथं पोचली होती. तिला पाहून आंजाच्या डोक्यावरच ओझ उतरल. पोलिसमामानी हटकल तर ही मुंबईतली बालिस्टरिण घेईन बघून अंजाच्या मनात आलं.
 शिवादादांची थोरली कारभरीण दगडवाडीत रहाते. ती जवळच्या आवशी गावाची. खात्यापित्या घरातली. पण तिरळ्या डोळयाची. बांगी. तिचा काका सरकारी नोकरीतला. खात्यापित्या घरी सणावाराला, पाहुण्यारावळ्याला पुरण पोळ्याचा गोड घास असे. फक्त तुपाच्या वाटी ऐवजी दुधाची वाटी शेजारी ठेवीत. भामावैनी अंगाने खूप थोराड होती. तिच्या काकानं दहा हजाराच्या नोटा शिवादादाच्या खिशात कोंबल्या नि पुतणी त्यांच्या उपरण्याला बांधली. शिवादादांना पाच एकर रान होत. ते ऐकटेच पैका हाती आल्यावर ते लातूरला जाऊन गवंडी काम शिकून आले आणि तिथल्याच ओळखीपाळखीवर दोन वर्षात थेट मुंबई गाठली. पण ते भामा वैनीला पैसे पाठवितात. सालातून एक दोनदा येऊन जातात.


शोध अकराव्या दिशेचा / २६