पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३६

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होती. पण आता मात्र त्या पलिकडे मला स्वतंत्र अस्तित्व नाही.
 अनूच्या मनात आज प्रश्नांच्या छटा उगवत होत्या.
 १९७४ च्या दिवाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना घेऊन अनू बाबा आमटयांच्याकडे सोमनाथच्या शिबीरासाठी गेली होती. तिथला प्रत्येक दिवस काही नवे देणारा. ते सारे पाहून मुलांनाही प्रश्न पडे. सतत काम करणारे, काही ना काही निर्मितीत मग्न असणारे हे झिजणारे हात... पाय. या हसतमुख माणसांना महारोगी म्हणून का हिणवायचे?
 "अगं अनू, इथे आम्ही ना फक्त चहा आणि कॉफी पावडर विकत घेतो. आणि कधीमधी साखर. सकाळची कांजी, चहा सुध्दा गुळाचा. त्याची चव अधिक टेस्टी." भाजी निवडताना साधनाताई सांगत.

 संपूर्ण भारतातून अगदी काश्मिर पासून सहाशे तरूणतरूणी शिबीरात आले होते. भवताली घनदाट जंगल. पण सहाच्या आधीच सूर्य पानांच्या दाटीवाटीतून वाट काढून सर्वांगाला बोचायला लागे. साडेसहाच्या कुदळ फावडी टोपल्या घेऊन मुले श्रमदानासाठी बाहेर पडत. युदकाका, शहाकाका, पंडित काका यांच्या सारखी बुजुर्ग मंडळीही तेवढ्याच उत्साहात कुदळ फावडं घेवून पुढे असत.
 साडेआठला उन्हाचा कहर सुरु झाला की सगळे छावणीत परतत. थंडगार पाण्याने हातपाय तोंड धूवून गर्रम खिचडी नाहीतर सांजाच्या नाश्त्यावर ताव मारीत. हे अन्नही जे महारोगी आता बरे झाले आहेत, जखमा भरून रोगाच्या मर्यादा ओलांडून अलिकडे आलेल्यांनी तयार केलेले असे. पहिल्या दिवशी काही मुलामुलींच्या तोंडात घास घुटमळला. पण त्या अन्नाच्या संपन्न सुगंध, देखणं रूप, आणि भूक वाढवणारी चव अनुभवताच मुले जेवणावर ताव मारू लागली. सकाळी श्रमाने शरीर थके तर जेवणापूर्वी बौध्दिकांनी डोक्यात निर्माण झालेल्या वादळांनीही दमायला होई. मग जेवण म्हणजे साक्षात अमृतानुभव. एक दिवस महाविद्यालयातला अत्यंत व्रात्य, टोमणे मारून मुलींना... प्राध्यापकांना सतत छेडणारा अरविंद जेवता जेवता उभा राहिला नि भरल्या डोळ्यांनी जड आवाजात बोलू लागला.
 "मॅडम आत पाय झिजवत अपंग करणारा महारोग ज्यांना देवाने दिला त्यांना बाबांनी... एका माणसाने संकटाशी लढून जगण्याला समर्थ करणारे निरोगी हात पाय दिले आणि मन दिले. भलेही ते आम्हाला दिसत नसेल पण ते समर्थ हात... शेती करणारे, अन्न निर्माण करणारे हात आमच्या पोटात गेले आहेत. त्यांनी आम्हाला शक्ती दिलीय...'


शोध अकराव्या दिशेचा / १३६