पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आला की खराताकडे येत. शिवेबाहेर असला तरी शिकलेला म्हणून सगळे इज्जत देत. पण श्रीभैय्या डोंगरात यायला लागल्यापासून सुभान्याला सर्व जण खरात भाऊ म्हणत. श्रीभैय्यांनी खरात वहिनीला पिठाची गिरणी टाकायला मदत केली. स्वतःचे हजार रूपये घातले. बँकेतून कर्ज मिळावे म्हणून जामिनदार राहिले. मात्र गिरणी सुरु झाल्यावर दर महिन्याला परतफेडीची आठवण करून देत. कर्ज केव्हाच फिटले. अण्ण्यादादा, पक्याभाऊ, श्रीभैय्या खराताच्या घरी चहा पितात हे पाहून गावातल्या तरूणांची भीड चेपली. तेही शेळीचा दुधाचा चहा पिऊ लागले.
 "ओ कुशाक्का अगं धान कोरडं असतंया. त्याला कसलाग बाट? आन् धान पिकवणारा माळी द्येवच की. जा खरात वैनीच्या गिरणीवरून आण दळूण जवारी." "वैनी, वीस पैशाला किलोभर दळण देती. आंब्याला त्येच दळण आठ आने किलोनी देतात. तितं कोनी जात इचारीत न्हाई. अग कष्ट कमी कर. जातीला काय बघायचं?" अशी बायांत चर्चा चाले. गांव वाढत गेलं. दुसरी गिरणी आली. पण खरातवैनीचा स्वभाव, स्वच्छ राहणी, नेकी यामुळे तिची गिरणी जोरात चाले....
 .... खरात भाऊंना सारे आठवले. त्यांची नजर उघड्या बोडक्या डोंगरावरून फिरली ते विषादाने श्रीनाथला म्हणाले, भैय्या, झाडाला बी मन असतं. दगडाला बी मन असते असं मानणारी मानस आपन. पन दुकाळाच्या फेऱ्यात खाटका सारखी झाडं कापून काढली आमी. भाकर भाजायची तरी लाकडं हवी नि मानसाला शेवटची वाट दावायची तरी लाकडच हवी..
 "चला खरातभाऊ दिशा सापडली की वाटही सापडत असते." श्रीनाथने खरातच्या पाठीवर आश्वासक थाप दिली आणि ते डोंगर उतरू लागले. उतरता उतरता श्री मध्येच थांबला आणि त्याने उजवीकडे वळून पाहिले. उंचच उंच चढाव होता. ते उभे होते ती थोडी सखल जागा होती. डावीकडे परत खोल उतार. तो उतार थांबत थांबत थेट निळाईच्या किनाऱ्याला टेकला होता. श्रीनाथच्या लक्षात आले की ते थांबले आहेत त्या जागेवरची माती कमी झाली आहे आणि खालच्या कातळाचा चेहेरा उघडा पडू लागलाय. त्याने घाईने परत देवठाणचा रस्ता धरला आणि मुक्काम न करताच दोनच्या बसने तो आंब्याकडे परतला.


शोध अकराव्या दिशेचा / १३४