पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 'गो टु द पीपल, लीव विथ देम... लोकांपर्यंत म्हणजे त्यांच्या जगण्या, घडण्या वा उमलण्याच्या रीतीपर्यंत पोचा. मग त्यांच्यातले होऊन राहायला हवे.'
 श्रीनाथ काहीशा आजीजीच्या सुरात अनूशी बोलत होता. त्याचा हा काहीसा अपराधी... निम्नसूर अनूला बोचला. उभयतांमधली विश्वासार्हता तर गढूळ तर नाही? असा भास तिला अलिकडे होई.
 'श्री, अरे लग्न करतांनाच आपण सर्व ठरवलेय ना? पहाता पहाता आपल्या लग्नाला पंधरावर्षे झालीय. जनक आठवीत गेलायं. इरा सहावीत गेलीयं. आणीबाणी संपून पाचवर्षे झालीत. तू घरात अडकावस असं कसं वाटेल मला? तुझ्या नि लोकार्थच्या प्रत्येक निर्णयात मी आहेच. वण वण केल्याशिवाय जे हवे आहे त्याची दिशा कशी गवसणार? फक्त एकच लक्षात ठेव. आता स्वैपाकालाही यमुना मावशी आहेत. शिदोरी मात्र भरपूर घेऊन जात जा. पोटाचे हाल नको करूस... आणि अशा अजीजीच्या स्वरात पुन्हा मला आळवायचे नाहीस. बी.ए गुड फ्रेंड"... श्रीनाथच्या पाठीवर एक बुक्का घालून अनू जिना उतरून खाली आली... पुन्हा खालून तिने जनकला हाक घातली. श्री व्हरांड्यात आला.
 "श्री, आज प्लॉटकडे चक्कर मारून मग डोंगरात जा. चार दिवसांनी घरावर स्लॅब पडणारेय... येते मी." असे म्हणत तीने स्कूटर सुरू केली.
 गेल्या सहा महिन्यांपासून श्रीनाथ आठवड्यातून तीन दिवस डोंगरात जातोय, बरोबर कधी पक्या तर कधी अशक्या. अधून मधून आण्ण्या. या चाळीस गावांतली पांढरी आणि काळी श्रीनाथच्या घनदाट परिचयाची झाली आहे. अंकुशाने हाती सोपवलेला दगडवाडीचा दहा एकराचा तुकडा आणि देवठाणचा ठाणाबाई डोंगरात शहा काकांच्या मदतीने घेतलेला दहा एकराचा तुकडा. प्रयोगासाठी आता हाती जमीन आहे. पण.. पाणी...? ...? श्रीनाथ आणि खरातभाऊ ठाणवाईच्या उंचवट्यावर उभे राहून खालचा पट्टा न्याहाळत होते. मनासमोर नेमके काहीच उभे राहत नव्हते. खरातभाऊंना जुने दिवस आठवले.

 ... रान सिताफळाच्या झुडपांनी झुबरलेलं असायचं. भाद्रपदात ते इवलाल्या सुंगधी फुलांनी असामंत गंधित करीत असे. पळस होते. निंबाची झाडे होती. निंबारा होता. निबाऱ्याची पाने निंबासारखीच पण फुलांचा मोहर जांभुळ पिवळा. उन्हाच्या कहारात शहरात येणाऱ्यांना झाडाची सावली गारवा देई. देवठाणात शाळा नव्हती.


शोध अकराव्या दिशेचा / १३२