पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उनका जीना. फिरभी हसती है, रोते रोते खाना पकाती है, आदमीके साथ सोती है, बच्चे पैदा करती है, क्या करे? अल्लाने रखा वैसे रहेना. ये झाडाभी वैसीच. गंदे पानीके बाजूमे उगनेवाली. पानी हो ना हो फिरभी जामुने रंग के फूलोंमे लदी. जैसे की, हम भी रोते रोते सपने सजाती है....
 है ना?...."
 गेल्या वर्षी ममदू गांधीपुरा झोपडपट्टीत रहायला गेला. पण अमीनाने मात्र मनात घर बांधलेय. अनूच्या नजरेसमोर अगदी बारकुडी खोल डोळ्यांची अमीना उभी राहिली.
 ...भवताली दूरवर पसरलेला पिवळट करडा माळ, नजर थके पर्यंत. आणि अनूला एकदम थकल्यासारखे झाले. फक्त कपभर चहा पिऊन ती सकाळच्या सव्वासातच्या तासाला महाविद्यालयात आली होती. श्रीनाथ काल सकाळीच डोंगरातल्या खेड्यात गेलाय. आज दुपारपर्यंत येईल. तो नसला की एकटीसाठी चारीठाव स्वैपाक करायचा कंटाळा येतो. शेजारच्या सुधावहिनींनी संध्याकाळी दोन मेथीची थालिपिठं दिली होती. मनूदादा ऑफिसातून घरी येतात तेव्हा त्यांना रोज वेगवेगळे ताजे खाणे लागते आणि सुधावहिनी हौशीने नवनवे पदार्थ करीत असतात. त्यांच्या हाताला खमंग चव आहे. संध्याकाळी खाल्लेली थालिपिठं केव्हाच पोटात जिरून गेली होती आणि आता मात्र पोटात भुकेचा कडाका उठला होता. अनूचे पाय घराच्या दिशेने वळले. घर तरी कुठे जवळ होते?

 पहाता पहाता जयवंती नदीचा पुल आला. नदीच्या अल्याडच्या कडेला गुलमोहोर उभा आहे. तर पल्याड शिरिष, गुलमोहोर पानगळीने सुस्तावला आहे. निष्पर्ण वृक्षावरची एखादीच लालमपरी डोळे किल्किले करून पाहते आहे. शिरिषावर या दिवसांत पिवळसर बिस्किटी रंगाच्या लांबोड्या शेंगाचे खुळखुळे वाजत असतात. लिंबवृक्षांवरचे चांदणी फुलोर दिसेनासेच झालेत. शिरिषफुलांचा लहरता मधुर गंध संध्याकाळी वाऱ्याच्या झुळकीबरोबर येऊन नाकात हुळहुळायला लागला की समजावं, वसंतऋतु अंगणात उभाय. पण गेल्या तीन-चार वर्षात वसंतही हरवला आहे. ऐन फेब्रुवारी… मार्च मध्येच उन्हाचे गरम चटके जाणवू लागतात. सकाळी सातलाच उन्हें डोळ्यावर येऊ लागतात… अशा उन्हाच्या तडाख्यातही महाविद्यालयातील मुले भरभरून वर्गात येत असतात. परिक्षा अगदी तोंडावर आलेल्या आणि पंधरा मार्च, महाविद्यालयाच्या शेवटचा दिवसही जवळ आलेला. अशा या महत्वाच्या दिवसात


शोध अकराव्या दिशेचा / १२