पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/११५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 आज सकाळी श्रीभैय्या, पन्नलाल भाऊ, बापू, अनंतराव या साऱ्यांच्याच नवाने पत्रं आली आहेत. तीही न सेन्सॉर होता... न पाकीट फोडता..
 लोकनायक जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखाली सर्वजण एकत्र आल्याशिवाय हिटलरी नकाब घातलेल्या काँग्रेसची क्रूरशक्ती चीत होणार नाही याची जाणीव जयप्रकाशींच्या पत्रांतून होती आणि त्यातच पक्षाचे व दलाचे पत्र होते. दोन भिन्न भूमिका आणि विचारानीती असणाऱ्या धारा एकमेकीत संपूर्णपणे मिसळून नवा संघटित समर्थ पक्ष म्हणून उभा राहू शकेल का, यावर मते मागवली होती.
 गेल्या चौदा महिन्यापासून बापू, अनंतराव यांच्या गटात धारियांची भर पडली आहे. धारिया, चंद्रशेखर ही बाईंच्या 'किचन कॅबिनेट' मधली तरूणतुर्क मंडळी... म्हणजे पन्नाशीतली. अत्यंत साधे, सतत हसतमुख असलेले धारियाजी आपली वैचारिक भूमिका अत्यंत मधुर पण ठाम शब्दांत समोरच्यांच्या मनी उतरवीत असत. श्रीकृष्णाचा जन्म जसा कारागृहात झाला तसाच नव्या जनतादलाचा जन्म कारागृहात होण्याचे वातावरण तुरुंगात होत होते. तुरुंगाच्या बाहेरही वातावरण उत्साहाने बहरले होते. प्रत्येकाच्या डोळ्यात नव्या आशा, आकांक्षा तरळू लागल्या होत्या. तुरुंगातील परिवर्तनवादी आणि लोकशाही समाजावादावर निष्ठा व श्रद्धा असणाऱ्या नेत्यांनी बौद्धिकातून मांडलेले विचार श्रीनाथच्या मनात सतत पिंगा घालित होते.
 "...आपण नव्या पक्षाचे सभासद होणार आहोत. सभासदांची भूमिका कोणत्याही पक्षात अत्यंत महत्वाची असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. सभासदांनी आपले नेते निवडायला हवेत. जेव्हा नेतेच सभासदांची निवड करून, पक्ष प्रवेश करवून घेतात तेव्हा खूपदा धोका संभवतो. एकात्मता (मोनोलिथझम्) शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, जबाबदारी व नेमणूकपध्दती यावर अत्यंतीक भर दिल्यामुळे विविधता, पुढाकारवृत्ती, लोकशाही, हक्क व निवडस्वांतत्र्य यांचा बळी जाण्याची निःसंशय शक्यता असते. सर्वसामान्य, दीनदलीत समाज घटकांच्या प्रश्नांची उत्तरे शोधून ती मिळवून देण्याचे 'पक्ष' हे एक ऐतिहासिक साधन आहे.
 हे साधन वापरतांना सभासदांनी सतत सजग रहायला हवे." हे विचार श्रीनाथच्या मनात घुमत होते.

 श्रीनाथ खूप अस्वस्थ हाता. शिस्त, उतरंड, कर्तव्य तत्परता, धर्म व जाती याबद्दल आस्था, जबाबदारी व नेमणूक पध्दतीवर अत्यंतिक भर देणाऱ्या विचारसरणीच्या निष्ठावंतांचे आणि विविधता, सर्वधर्मसमभाव, लोकशाही, विज्ञाननिष्ठा, हक्कांची जाणीव, स्त्रीपुरुष समता, साधनसशुचिता यांवर श्रद्धा असणाऱ्या निष्ठावंतांचे, दोन भिन्न प्रकृतीच्या समुदायांचे मनोमिलन होईल का? ह्या प्रश्नाने त्याच्या मनात थैमान मांडले होते. पुढचा रस्ता दिसत नव्हता. फक्त धुके होते.


शोध अकराव्या दिशेचा / ११५