पान:शोध अकराव्या दिशेचा.pdf/१०३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "लेका, तुझ्या वैनीनी खमंग तेलच्या दिल्यात. संध्याकाळचा भत्ता एकत्र बसून खाऊ. तू सांग सगळ्यांना"
 पुन्हा एकदा 'तेच ते तेच ते' पाढा सुरु झाला. आंब्याहून येतांना त्याने देवीप्रसाद चटोपाध्यायांचा 'लोकायत' हा ग्रंथ आणला होता. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याला तो हवा होता. अनूच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात तो नुकताच आणला होता. ग्रंथपाल प्रभाकर जोशी भेटायला आले तेव्हा येताना काही नवी, चांगली, दुर्मिळ पुस्तके घेऊन आले होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे ॲनिहिलेशन ऑफ कास्ट, बहिष्कृत भारत, शरद पाटलांचं 'दास शुद्रांची गुलामगिरी' ही हवी असलेली पुस्तके त्यात होती. एक नवं बेट हाती आलं होतं. श्रीनाथ खुश होता. राजबंदींना मिळणाऱ्या सवलती मिळाल्यापासून कॉट्स, स्वच्छ चादरी, तकिया.. उशा, टेबललँप, या सोयी मिळाल्या होत्याच. त्याचा पुरेपुर उपयोग श्रीनाथ घेत होता. अनेकजण रोज मिळणाऱ्या फलाहारावर... सफरचंद, केळी, चिकू, नाकिशची द्राक्षं याच्या स्वादामुळे, तसेच रोज मिळणाऱ्या पंचवीस ग्रॅम साजुकतुपावर खुश होते. श्रीनाथ रात्रंदिवस त्या भल्यामोठ्या तक्क्याला टेकून वाचण्यात गुंग होई. 'लोकायत' म्हणजे एक महासागरच, सर्व सामान्य माणसाच्या जगण्याच्या अनुभवातून एक जीवनरीती निर्माण झाली. या जीवनरीतीवर आधालेले अत्यंत प्राचीन असे तत्वज्ञान म्हणजे 'लोकायत'. 'लोकेषु आयतः' ते लोकायत या शब्दाची विलक्षण मोहिनी श्रीनाथच्या मनावर पडली होती. ग्रामीण परिसरातील मारवाडी... राजस्थानी कुटुंबांत वाढतांना समाजातील जातीयतेचे थैमान, त्याने अगदी आठवते तेव्हापासून अनुभवले होते. त्या छोटाशा गावात भटगल्ली, पाटील गल्ली, देशमुखांची गढी, माळवाडा अशा वस्त्यातून त्या त्या जातीचे लोक रहात. त्याच्या गावात चौथीपर्यंत शाळा होती. वर्गात सगळ्या जातीजमातीची मुले असत. पण बसतांना मात्र अगदी आपोआप त्यांच्यात एक न दिसणारी भिंत असे. पाटील देशमुखाच्या जवळ ब्राम्हणाची चार दोन पोरं बसत. नंतर मारवाडयाची. माळी, शिंपी, सोनार मुलांची एक रांग, मग लोहार, सुतार, मुसलमानाची मुलं. गावकुसाबाहेर रहाणाऱ्यांच्या मुलांची रांग वेगळी असे. चार दोन मुली असत. त्या मास्तरांच्या खुर्ची शेजारी बसत. नाना माळी, लखू यादव, शिवा पन्हाळे श्रीनाथचे खास दोस्त. तो कधी त्यांच्या शेजारी जाऊन बसला तर घरी लगेच बाईला कळत असे. भवतालच्या भावकीच्या घरातील शिवनारायण, भगवानदास ही मुलं घरी कळ लावून जात.

 "माळ्या मराठ्या का छोरां साथं क्यूं खेलं रे?....अपणा अपणा जात का छोरां साथं खेलणो... बिरामणाका छोरां साथं खेलनो...!!" हे ऐकत तो दहावर्षांचा झाला.


शोध अकराव्या दिशेचा / १०३