गतीन साथीला आलेले दैन्य पळवायचे असेल तर अणुयुगातील नवतंत्रांचे हरणटप्पे हवे आहेत. त्यासाठी ते आनंदवनातील कुष्ठपीडितांचे सामर्थ्य दाखवून माणसास कृतिप्रवण करतात.
पुढे जाऊन मग ते 'वधस्तंभाच्या छायेत' मध्ये कुष्ठपीडितांच्या पुनर्वसन कार्यामागची आपली भूमिका समजावतात. बाबा आमटेंच्या लेखी अजंठावेरूळमधील पाषाणांच्या भग्न मूर्तीतील सौंदर्यापेक्षा हाताची बोटे, तळवे झडल्याने निर्माण होणारे कारुण्य अधिक महत्त्वाचे असते. 'मरण भोगुनि हसत राहती ते मृत्युंजय' म्हणून त्यांना कुष्ठपीडित धडधाकट माणसापेक्षा जास्त आश्वासक, पराक्रमी भगीरथ वाटतात. मी माझ्या ऐन उमेदीत बाबा आमटेंकडे सोमनाथच्या जंगलात बोटं झडलेली दोन माणसं दोन तळव्यात प्रहार पकडून काळ्याकभिन्न पत्थराला पाझर फोडत विहीर खोदताना पाहिली आहेत... त्या दिवसापासून मी स्वतःला स्वस्थ बसू दिलेले नाही. माणसास अस्वस्थ आत्मा बनविणारी ही कविता सामाजिक वधस्तंभावरील फाशीपासून तुम्हाला वाचवते. बाबा आमटेंच्या कविता शिळोप्याचे वाचन म्हणून वाचता येत नाही. कारण संघर्षातील येणा-या निराशेतही त्यांचं चालत राहणं... ‘एकला चलो रे'चं कृतिशील तत्त्वज्ञान असतं.
‘ज्वाला आणि फुले'मध्ये एकलव्य, विश्वामित्र, प्रॉमिथियससारखी मिथक बनून येणारी चरित्रं भेटतात तसेच महात्मा गांधी, आचार्य विनोबा, जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रूपाने समाज पुरुषही! जोडीला रवींद्रनाथ टागोर, साने गुरुजी, नित्शे भेटतात. अन् त्यांच्याबरोबर येणारे वाद, विवाद, विचारधारा, तत्त्वज्ञानही! बाबा आमटेंचा ‘एकलव्य' हा केवळ कवितेचा नायक म्हणून येत नाही. तो असतो युगाचा प्रतिनिधी. ज्ञान नाकारल्या गेलेल्या शंभूकाचा तो सहोदर असतो तसा पाच हजार वर्षं शिक्षण नाकारलं गेलेल्या दलित, वंचित वर्गाचाही तो प्रतिनिधी बनून येतो. जन्मजात प्रतिष्ठेची कल्पना झुगारत ‘मदा यतुं पौरुषम'ची तो मोहर उठवतो. जन्मवान श्रेष्ठ की ‘कर्मवान असा प्रश्न विचारतो. स्पर्धेचं आव्हान स्वीकारतो नि प्रत्येक स्पर्धा जिंकतच राहतो. घटपटांची उतरंड नाकारतो. ‘पाप्याचं पोर' म्हणवून घेणं ठोकरतो. ज्याची स्पर्धा न्यूटन, आर्किमिडजशी... त्याला जिंकणार कोण? असं स्फुल्लिंग चेतवणारी ही कविता नकारघंटा न होता एक क्रांतिगीत बनून जाते.
ही कविता एका अर्थाने बाबा आमटे यांचं जीवनविषयक तत्त्वज्ञान