पान:विज्ञान-प्रणीत समाजरचना.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१९७)

ण्याची पाळीच आली नाही म्हणून हा पोक्त उपदेश त्यांना सुचतो आहे इतकेच.
 प्रयोगनिष्ठा, बुद्धिवाद, समता, व्यक्तिस्वातंत्र्य ही पाश्वात्य संस्कृतीची आदिमहातत्त्वे आहेत यंत्र, जडवाद भोगवाद हा त्या तत्त्वांचा केवळ फुलोरा आहे. या तत्वांच्या आचरणाने पश्चिम आज दिग्विजयी झालेली दिसत आहे. पूर्वेकडचे जे देश तिला जिंकता आले नाहीत त्यांनी सर्वस्वी जरी नाही तरी अंशतः यांतील काही तत्त्वांचा आश्रय केला आहे आणि म्हणूनच त्यांना यश आले आहे हे आपणास स्पष्ट दिसत आहे. या वरील गोष्टी एकापुढे एक मांडल्या की यातून निर्णय काय निघतो, ते सांगावयास पाहिजे असे नाही. आपल्या प्राचीन वैभवाने पुन्हा जगात तळपावे ही पूर्वेला इच्छा असेल तर, तिचे सर्वस्वी पश्चिमीकरण होणे अवश्य आहे. मागल्या काळाकडे थोडी दृष्टी टाकली तर असे दिसेल की हे पश्चिमीकरण तिला अगदी जड जाईल असे नाही. कारण जडवाद व लोकशाही ही तत्त्वे, वगळली तर बाकीची तत्त्वे, अगदी बोजड, व प्राथमिक स्वरूपाने का होईना, नकळत का होईना, प्राचीन काळी हिंदुस्थानात माणसांनी आकलन करून थोडीबहुत आचरणातही आणली होती. त्याच तत्त्वांचा आता पश्चिमेकडे पूर्ण विकास झालेला आहे. तेव्हा नव्या व शास्त्रशुद्ध स्वरूपात पूर्वेने त्या तत्त्वांचा फिरून अधिकार करून आपले गतवैभव पुन्हा प्राप्त करून घेण्याची ईर्षा बाळगली तर त्यात काही अश्लाघ्य किंवा अवमानाचे आहे, असे मुळीच म्हणता येणार नाही.