पान:वनस्पतिविचार.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८८     वनस्पतिविचार.     [ प्रकरण
-----

 वनस्पति उच्चवर्गीय असो वा क्षुद्रवर्गीय असो. प्रत्येकीस ' पोषण व प्रजोत्पत्ति ' ही दोन कर्तव्ये सारखी लागू आहेत. ही दोन कर्तव्ये करणे अथवा ती घडवून आणण्याची खटपट करणे, ह्याविषयी वनस्पतीचे प्रत्येक अवयव आपआपल्यापरी वनस्पतीस उपयोगी पडते. वनस्पतीचे सर्व भाग ह्याच कर्तव्यांत परोपरीनें निमग्न आढळतात. ही गोष्ट खरी की, प्रत्येक भागास उत्पत्ति करितां येणार नाही. अथवा पोषणही साधता येणार नाही; पण त्यांचे अंतिम साध्य ह्या तत्त्वांकडे असते, हे सहज दिसून येणार आहे. अप्रत्यक्ष रीतीने का होईना, पण प्रत्येक भागाचा प्रयत्न जीवनक्रमान्त ह्या गोष्टीविषयी असतो. क्षुद्रपेशी अथवा मोठा वृक्ष ही दोन्ही आपआपला जीवनक्रम आक्रमित असतात. दोन्हींमध्ये वर सांगितलेली मुख्य कर्तव्ये साधारण आहेत. क्षुद्रपेशी एकटी असल्यामुळे आपली कर्तव्ये पार पाडण्याच्या हेतूने आपला क्षुद्र प्रयत्न करून शेवटी पोषण व उत्पत्ति ही दोन्ही साधते. मोठ्या वृक्षास निरनिराळी अवयवे असल्यामुळे प्रत्येकाकडून वेगवेगळे काम करवून शेवटी तो वृक्ष ती दोन्ही अंतिमकर्तव्ये साधितो. प्रत्येकाच्या ' शारीर ' संकर्णितेप्रमाणे व श्रमविभागाच्या सोईप्रमाणे, प्रयत्नांत तसेच रीतींत थोडा अधिक फरक असेल, पण मुख्य अंतिम साध्यांत फरक नसतो.

 वरील चार अवयवांपैकी पहिली तीन अवयवें पोपणक्रिया घडवून आणण्यात खटपट करीत असतात. उत्पत्तीस शेवटलें एक अंग पुरे असते. शिवाय शरीर पूर्ण वाढल्याखेरीज प्रजोत्पत्तीचा विचार अमलात येत नाही. म्हणूनच उच्चवर्गात अथवा क्षुद्रवर्गात शरीरसंवर्धन पूर्ण झाल्यावर उत्पत्तीसंबंधाची अवयवे येऊ लागतात. तोपर्यंत उत्पत्तीची अवयवे येत नाहींत. हे तत्त्व केवळ वनत्पतींमध्येंच दृष्टीस पडते असे नाही, तर प्राणिवर्गामध्ये सुद्धा ही स्थिति आपण पाहतो. शरीर पूर्ण वाढून योग्य ऋतु येईपर्यंत उत्पत्तीसंबंधी विचार प्राणिवर्गातही नसतो. अवयवें प्रथमपासून असतील; पण त्यांमध्ये त्यावेळी प्रजोत्पत्तीचैतन्य नसते. ऋतु प्राप्त झाला व योग्य परिस्थिति जुळली, म्हणजे उत्पत्तिकार्य आपोआप घडून येते. प्रत्येक वर्गाचा योग्य ऋतु व उत्पत्तिकाल वेगवेगळा असतो.

 पोषणक्रिया घडविणे हे कांहीं साधे काम नाहीं; ते साध्य करविण्यास तीन अवयवें अहोरात्र खटपट करीत असतात. नुसत्या अवयवांची खटपट होऊन