पान:युगान्त (Yugant).pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१८६ / युगान्त


राज्याचा वारस नव्हता. तो वारसांपैकी दुय्यम होता, नव्हताच म्हणावयास हरकत नाही.

 त्याच्या लग्नाने एक मोठी सोयरीक जडत होती. अर्जुनाचा मुलगा हा मोठेपणा होताच व दुसरा काही बांधा येत नव्हता. द्रौपदीची मुले मारली जातील, असे कोणाच्या स्वप्नीही नव्हते. अभिमन्यूने, घटोत्कचाने व इरावताने लढाईच्या खाईत उड्या घेतल्या पण द्रौपदीच्या मुलांच्या बाबतीत तसे दिसून येत नाही. ती मुले राज्याची वारस होती. ती सर्व लढाई झाल्यावर जिवंत होती. अश्वत्थाम्याने कपटाने व क्रूरपणाने त्यांची हत्या केली नसती,तर ते युवराज म्हणून वावरले असते; त्यांची लग्ने झाली असती,पण ते मारले गेले. शेवटी अभिमन्यूचा मुलगा पोटात होता, तो मरता - मरता वाचला व राजा झाला. ह्यात कृष्णाचे काही कारस्थान नव्हते. कृष्ण शहाणा होता, दूरदर्शी होता, पण त्रिकालज्ञ व सर्वशक्तिमान नव्हता. त्याने आपल्यापुरती काही उद्दिष्टे ठेविली होती, पण ती पुरी करताना त्याने स्वतःला काही मूल्यांची मर्यादाही घातली होती. आपल्या मुलांना राज्य मिळवण्याची ज्याने खटपट केली नाही, तो आपल्या भावांच्यासाठी काही हीन कारस्थान करील असे संभवत नाही.
 कृष्ण- पांडवांच्या मैत्रीमुळे पांडवांचा सर्व तऱ्हेने लाभ झाला. स्वकुळाच्या दृष्टीने व अगदी स्वतःच्या दृष्टीने कृष्णाचाही लाभ झाला. जरासंध मारला गेला व सर्वोत्तम क्षत्रियाग्रणी म्हणून क्षत्रियसभेत पहिला मानाचा अर्घ्य मिळाला; पण कृष्णाची अर्जुनाशी जी मैत्री होती; ती निरपेक्ष होती. कृष्णाला अर्जुनाची गाढ मैत्री मिळाली, पण दुसरा व्यावहारिक लाभ झाला नाही. कृष्णाने तितक्याच उत्कटतेने अर्जुनाला जीव लावला व आपली सर्व प्रज्ञा, साहस अर्जुनाचे शरीर, यश व आत्मा ह्यांचे धारण व संरक्षण करण्यात घालवली.
 भीष्मपर्वात, द्रोणपर्वात व कर्णपर्वात अर्जुनाने निरनिराळ्या