पान:युगान्त (Yugant).pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. युगान्त/११९ मरताक्षणीचे वर्तनही तो मुलाच्या मरणाचे वृत्त ऐकून दुःखाने स्वस्थ विषण्ण होऊन बसला, व त्यामुळे मारला गेला, ह्या रूढ समजुतीशी विसंगत आहे. द्रुपदाचे अर्धे राज्य गेले, त्यावेळी आपल्या पराभवाचा सूड घ्यावा म्हणून द्रुपदाने यज्ञ केला. वाडवडिलांपासून आलेले राज्य तिहाइता-कडून हिरावून घेणाऱ्या आपल्या शत्रूचा सूड धृष्टद्युम्नाने- त्या यज्ञातून मिळालेल्या मुलाने उगवला. गीतेमध्ये ब्राह्मणांची क्षमा, शांती वगैरे जी लक्षणे दिलेली आहेत, त्यांपैकी कोठचेच लक्षण द्रोणाच्या ठिकाणी दिसून येत नाही. तरीही महाभारतात द्रोणाची भूमिका निंद्य किंवा गर्दा अशी झालेली नाही. ह्याउलट परिस्थिती त्याच्या मुलाची आहे. अश्वत्थाम्याने ब्राह्मणत्वाचे सर्व गुण पार झुगारून दिले होते; एवढेच नव्हे, तर त्याचा सर्वस्वी अधःपात झाला होता. आणि वैर-प्रतिवैर ह्या न संपणाऱ्या मालिकेतील त्याच्या कृत्याला भयंकरपणात व निर्दयपणात कुठे तोड नाही. अश्वत्थामा पहिल्यांदा महाभारताच्या गोष्टीत येतो, तो दारिद्राने गांजलेल्या एका ब्राह्मणाचा मुलगा म्हणून. द्रोणाला भीष्माने आश्रय दिल्यावर बाकीच्या मुलांबरोबर तो बापाजवळ अस्त्रविद्या शिकला. अस्त्रविद्येत त्याची आणि अर्जुनाची बरोबरी होती, अशा त-हेचे उल्लेख महाभारतात जगोजागी येतात. द्रोणाने दिलेल्या विद्येवरच संतुष्ट न राहता आणखी विद्या शिकायला धर्माने अर्जुनाला पाठवले होते. तसे अश्वत्थाम्याच्या बाबतीत झालेले नाही. शिवाय, त्या वेळेच्या तरुण योद्ध्यांना अर्जुन म्हणजे योद्धेपणाचे प्रतीक वाटत असे. तसा लौकिक अश्वत्थाम्याला कधीही प्राप्त झाला नव्हता. कौरवांच्या सभेत तो थोडासा उद्दामपणेच वागत असे. बाप भीष्माच्या बाजूने बोलत असे, तर तो दुर्योधनाच्या बाजूने बोलत असे. अश्वत्थामा म्हणजे मोठा योद्धा आहे, असे दुर्योधनाला वाटले नाही. अश्वत्थाम्याचे नाव सेनापतिपदाच्यासाठी कधी कोणी सुचवलेही नव्हते आणि ते कुणाला सुचलेही नसते.