पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५९७
मराठेशाहीचा अंत
 

आदगाव येथे भोसल्याचा पुन्हा पराभव केला (२९ - ११ - १८०३) आणि त्यांचा उत्तरेतील सेनापती लेक याने लासवाडी येथे शिंद्यांचा पराभव केला आणि देवगाव आणि सूरजी अंजनवाडी येथे दोघांशी स्वतंत्र तह केले.

होळकर
 यानंतर मग यशवंतराव होळकर उठला. तो अतिशय पराक्रमी होता. कर्नल मॉन्सन याचा त्याने पराभव केला आणि इंग्रजांना हैराण करण्याची वेळ आणली. पण त्याजपाशी पैसा नव्हता. त्यामुळे अनेक लोक त्यास सोडून गेले. ७० हजार फौजेवरून त्याची फौज वीस हजारांवर आली आणि शंभरांपैकी वीसच तोफा शिल्लक राहिल्या. त्यामुळे तोही टेकीस आला आणि १८०५ च्या डिसेंबरात राजपूर घाट येथे इंग्रजांशी त्याने तह केला. मराठेशाही संपूर्णपणे इंग्रजांच्या कबजात गेली.

इंग्रजांचे कर्तृत्व
 एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे की याच वेळी इंग्रजांचे युरोपात नेपोलियनशी युद्ध चालू होते. इंग्लंडचे स्वातंत्र्य जाईल की काय, अशी भीतीही निर्माण झाली होती: पण राष्ट्रभावना, स्वातंत्र्यनिष्ठा, राजनीती या बळावर त्यांनी १८१५ साली ते युद्ध जिंकले. तेच त्यांचे गुण त्याच काळात भारतात उपयोगी पडले. एवढी दोन प्रचंड युद्धे ! हजारो मैलांच्या अंतरावर चाललेली. पण इंग्रजांना कर्त्या माणसांचा तुटवडा पडला नाही. हिंदुस्थानात आर्थर वेलस्ली, मरे, मॉन्सन, लेक, गव्हर्नर जनरल वेलस्ली सर्व एक होते. राष्ट्र हे सर्वाचे ध्येय होते. युद्धापायी त्यांनाही अफाट खर्च आला. कंपनीचा व्यापार बसण्याची वेळ आली. तेव्हा कोठे कोठे त्यांनी माघार घेतली. पण ती सर्व एका शिस्तीने, एका धोरणाने ! अशा इंग्रजांपुढे शतधा भंगलेल्या हिंदी समाजाचा निभाव लागणे शक्यच नव्हते.

बोलणी आणि करणी
 १८०५ च्या सुमारास शिंदे, होळकर व भोसले यांचे पराभव झाले. त्यानंतर मराठेशाहीचा अंत १८१८ मध्ये होईपर्यंत मध्यंतरी तेरा वर्ष गेली. या काळात इंग्रजांचे राज्य कोणासही नको होते. स्वतः पेशवा आणि गायकवाड, भोसले, होळकर व शिंदे यांना इंग्रजांची बंधने- जवळ जवळ कैदच- अगदी दुःसह झाली होती. आणि प्रत्येक जण या कैदेतून सुटण्याचा प्रयत्न करीत होता. प्रत्येकाच्या राजधानीत व प्रदेशात अनेक कारस्थाने शिजत होती. इंग्रजांना हाकून काढावे, स्वतंत्र व्हावे आणि मराठेशाहीचे रक्षण करावे, असे सर्वांच्या मनात होते. पण त्यासाठी अवश्य असणारे कर्तृत्व कोणाच्याही ठायी नव्हते. त्यांच्यांत परस्परांविषयी हेवेदावे तर होतेच, पण त्या त्या घराण्यातून भावाबंदांत त्यापेक्षा जास्त तीव्र असे मत्सर, वितुष्टे आणि हेवेदावे