पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३५
स्वराज्याचे साम्राज्य
 

आरमारी युद्धात स्वतः अनभिज्ञ असल्यामुळे, बाजीराव पेशव्याने जमेल तसा तह केला आणि मोहिमेतून अंग काढून घेऊन तो परत आला.
 यानंतर सर्वच मोहीम बारगळावयाची. पण शाहूछत्रपतींनी या वेळी जास्त नेट धरला. प्रथम त्यांनी पिलाजी जाधव यास कोकणात पाठविले. आणि नंतर मानाजी आंगऱ्याच्या आग्रहावरून चिमाजी आप्पा कोकणात उतरला. त्या वेळी रेवस बंदरा- नजीक मोठी लढाई होऊन सिद्दी सात हा 'रावणासारखा दैत्य' मारला गेला. मराठयांना मोठा विजय मिळाला. जंजिरा हस्तगत झाला नाही, अंजनवेल व गोवळकोट हे किल्लेही मिळाले नाहीत. तरी पण दुसरा एक सिद्दी सरदार याकूब हाही वरील लढाईत मारला गेला होता. त्यामुळे सिद्दी रहमान याने पूर्वीचा तह कायम करून युद्ध थांबविले.

रचनाच अपायकारक
 या मोहिमेचे विवेचन करताना नानासाहेबांनी लिहिले आहे, 'मराठमंडळाची शक्ती पाहिजे तितकी असूनही त्याची रचना राज्यवृद्धीस कशी अपायकारक होती याचे विशिष्ट उदाहरण ही जंजिऱ्याची मोहीम होय.' सत्ता महाराजांची, कर्तृत्व बाजीरावाचे. या दोहीचा मेळ बसला नाही की घोटाळे होत. जंजिऱ्याच्या मोहिमेतील अपयशाचे कारण म्हणजे वरील द्विमुखी कारभार होय ! (मराठी रियासत, पेशवा बाजीराव, प्र. २१४, २३३)

एकमुखी नेतृत्व
 या उलट वसईच्या संग्रामाची व्यवस्था होती. त्याची सर्व सूत्रे चिमाजी व बाजीराव यांच्या हाती होती. शिंदे, होळकर, बाजी भीवराव, तुकोजी व भिवाजी पवार इ. सरदार एकदिलाचे होते. म्हणून त्यांना हे अपूर्व यश मिळाले. हे यश अनेक दृष्टींनी अपूर्व असेच होते. मोगलांवर, निजामावर मराठ्यांनी अनेक विजय आतापर्यंत मिळविले होते. पण ते पौर्वात्य लोक. त्यांची युद्धपद्धती जुनी. पोर्तुगीज हे पाश्चात्य. दारूगोळा, शिस्त या सर्वच दृष्टींनी त्यांची पद्धती नवी, त्यांचा कारभार व्यवस्थित, संघटन अगदी दृढ; यामुळे मराठ्यांना त्यावर विजय मिळविता येईल असे कोणालाच वाटले नव्हते. पण तरीही मराठ्यांनी वसई जिंकली म्हणून हा विजय अपूर्व होय.
 १७१९ साली स्वराज्याच्या सनदा मिळाल्या आणि लगेच मराठ्यांनी कल्याण व भिवंडी ही ठाणी आपल्या ताब्यात घेतली. आणि तेव्हापासून पोर्तुगीज व मराठे यांचा नव्याने संग्राम सुरू झाला. मराठे सरदार वरचेवर कोकणात उतरत, मुलूख जिंकीत. पण देशावर निजाम, संभाजीराजे, मोगल ही राजकारणे चालू असल्यामुळे पेशव्यांना कोकणात लक्ष द्यावयास फारशी फुरसद होत नव्हती. वर सांगितल्याप्रमाणे १७३६ साली सिद्दीशी तह झाल्यावर त्यांना जरा उसंत मिळाली. याच वेळी पोर्तुगी-