पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
३७७
स्वराज्य आणि स्वधर्म
 

मिळोनी जाती, त्या चांडाळासि गती, कोठेचि नाही ॥ त्या काळात सर्वत्र मुस्लिम सत्ता होती. आणि लोकांत राष्ट्रभावना नव्हती. त्यामुळे फितुरी करण्यात काही पाप आहे, असे त्यांना वाटतच नसे. एक स्वामी सोडून दुसऱ्या स्वामीकडे जाणे इतकाच अर्थ ते मानीत. पण हा राष्ट्रद्रोह आहे, मुस्लिम हे शत्रु आहेत, हे समर्थांना लोकांना शिकवावयाचे होते. 'अमर्याद फितवेखोर,' 'फितव्याने बुडती राज्ये', 'बुडाले भेदवाही ते,'- असा फितुरांचा उल्लेख समर्थ वारंवार करतात. सर्वच वर्गात असे फितवे त्या काळी होते. तसेच सेवकांतही. समर्थ म्हणतात, 'हे सेवक कठिण, वेळेसि मिळोनी जाती शत्रुकडे ॥'
 राष्ट्रसंघटना याचा अर्थ मागे सांगितला आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीला राष्ट्राच्या उत्कर्षापकर्षास आपण जगाबदार आहोत अशी भावना असणे हा या संघटनेचा पाया आहे. म्हणूनच समर्थांनी राजा, सरदार, ब्राह्मण यांच्याप्रमाणेच राज्यातील सेवकांनाही स्वधर्माचा उपदेश केला आहे. कारण महाराष्ट्रराज्य व्हावे ही त्यांची आकांक्षा होती.

संघभावना
 मुस्लिम सुलतानांची सत्ता, त्यांची राज्ये ही सुलतानी राज्ये, राजांची राज्ये होती. ती लोकांची नव्हती हे खरे. पण मुस्लिम समाजात संघभाव जास्त होता. आपल्या बादशहाची सत्ता ही इस्लामची सत्ता आहे. सर्व काफरांना इस्लामची दीक्षा देणे हे तिचे उद्दिष्ट आहे. त्याला साह्य करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना प्रत्येक मुस्लिमात असते. त्या वेळी होती व आजही आहे. शिवाय ऐहिक ऐश्वर्य, सत्ता, धन, स्त्री यांचा आपल्या राज्यामुळे आपल्याला लाभ होतो, हेही मुस्लिमांना दिसत होते. त्यामुळे बादशाही सत्तेच्या मागे ते उभे असत. तशी स्थिती हिंदूंची नव्हती. वर्णव्यवस्थेमुळे, जातिव्यवस्थेमुळे क्षत्रियेतर लोकांना राज्यकारभाराशी आपला काही संबंध आहे, असे वाटतच नसे. त्यांच्या स्वधर्मात ते बसतच नसे. वर्णव्यवस्थेचे तत्त्वज्ञानच तसे होते. त्यात संत आणि आचार्य यांच्या निवृत्तिवादाची भर पडली. त्यामुळे स्वराज्याविषयी सर्व समाज उदासीन झाला आणि संघभाव जास्त दृढपणे जोपासणाऱ्या मुस्लिम आक्रमणाला बळी पडला. या समाजाला धर्म प्रिय होता. पण त्याचा स्वराज्याशी काही संबंध आहे अशी कल्पनाच त्याला नव्हती. हिंदुसमाजाच हा घातकी दोष जाणूनच त्याला राष्ट्रधर्माची दीक्षा द्यावयाची, स्वराज्य व स्वधर्म यांचा अभेद आहे हे तत्व त्याला शिकवावयाचे आणि ऐहिक ऐश्वर्याची आकांक्षा जागृत करून आपल्या राज्याचा मागे उभे राहण्याची प्रेरणा द्यावयाची, हे समर्थांनी ठरविले आणि नवे नेतृत्व निर्माण करून या कामी, राजकारणाच्या कामी, सर्व लोकांना वोढोनि आणिले. संतांनी परलोकाची, परमार्थाची, मोक्षाची द्वारे खुली करून सर्व मराठेजनांना ज्याप्रमाणे धर्माच्या कक्षेत वोढोनि आणिले, त्याप्रमाणे समर्थांनी