पत्रकारितेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अनन्यसाधारण
महत्त्व आहे. भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत सर्व भारतीय नागरिकांना 'विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य' असल्याचे स्पष्ट केले आहे हे आपण जाणतोच. परंतु आज भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याचे वास्तव आपण दररोज अनुभवत आहोत. एकूणच माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मृगजळासारखे बनले आहे. या पार्श्वभूमीवर एकांगी लढा देणारे आणि आपली भूमिका सत्यनिष्ठपणे सातत्याने मांडणारे रविश कुमार यांच्यासारखे दुर्मिळ पत्रकार आज अपवादाने आढळतात.
राजेशाही शासनव्यवस्थेत महाराजा सयाजीरावांनी पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाहीची केलेली जोपासना मानदंड निर्माण करणारी आहे. बडोद्यातील वर्तमानपत्रांची भूमिका तपासली असता 'राजाला आवडेल ते' या धोरणाला छेद देत 'जनतेच्या इच्छा आकांक्षा राजापर्यंत पोहोचविण्याचे माध्यम' हीच भूमिका 'बडोदावत्सल', 'सयाजीविजय' आणि 'जागृति' या तत्कालीन बडोद्यातील प्रमुख वृत्तपत्रांनी बजाविली असल्याचे दिसते. विशेष म्हणजे ही तिन्हीही वृत्तपत्रे सत्यशोधकीय विचारधारेची होती. अतिशय अल्प मराठी भाषक असणाऱ्या बडोद्यासारख्या गुजराथी संस्थानात या तीन मराठी