लोकांमध्ये सयाजीरावांचा वावर वाढला होता. हळूहळू स्वातंत्र्यासाठीच्या सशस्त्र क्रांतीच्या प्रयत्नांचे केंद्र बडोदा बनत चालले होते.
सयाजीराव आणि राष्ट्रीय काँग्रेस
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात भारतात ब्रिटिश सत्तेविरुद्धचा असंतोष वाढत चालला होता. जानेवारी १८८५ ला मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशन'ची स्थापना करण्यात आली. फिरोजशहा मेहता, बहरुद्दीन तैयबजी, दिनशा वाच्छा हे संस्थापक सदस्य होते. पुढे डिसेंबर १८८५ मध्ये अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या दोन्ही संस्थांच्या सदस्यांशी व पदाधिकाऱ्यांशी सयाजीरावांचे जवळचे संबंध होते. मुंबई प्रेसिडेन्सी असोसिएशनच्या तीन सदस्यांना इंग्लंडला जाण्यासाठी महाराजांनी अडीच हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य केले होते. सयाजीराव काँग्रेसच्या अनेक अधिवेशनास हजर राहिले होते. सयाजीरावांबरोबरच रावबहादूर माधवलाल नंदलाल, हरिलाल हर्षदराय, अब्बास तैयबजी, सुमंत मेहता, मोहनलाल पंड्या आणि दिवाण अंबालाल साकरलाल हे बडोदा संस्थानचे अधिकारीही काँग्रेसच्या अधिवेशनात उत्साहाने भाग घेत.
१८९२ मध्ये अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस समितीचे कार्यकर्ते दादाभाई नौरोजी हे लिबरल पार्टीचे उमेदवार म्हणून इंग्लंडच्या फिन्सवारी भागातून ‘हाउस ऑफ कॉमन्स'च्या निवडणुकीसाठी कॅप्टन एफ. टी. यांच्याविरुद्ध उभे होते. सयाजीराव महाराजांनी