पान:महर्षी दयानंद काय म्हणाले? (Maharshi Dayanand Kay Mahnale?).pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परमेश्वराचे गुण स्वत:मध्ये आणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मोठी कामे करून त्याने मोठे बनावे. त्याने समर्थाहून समर्थ बनावे, आपले सामर्थ्य सतत वाढवावे, कधीही अधर्माचरण करू नये. सर्वांवर दया करावी, आपल्या प्रगतीची साधने सर्व परिपूर्ण बनवावीत. तंत्रज्ञानाचा विकास करून नाना प्रकारची उपकरणे तयार करावीत. साऱ्या जगातील जीवांना आपल्या आत्म्याप्रमाणेच सुखदुःख होत असते हे ओळखावे, सर्वांचे रक्षण करावे. विद्वानांमध्ये विद्वान बनावे, दुष्कृत्ये करणाऱ्या दुष्टांना शिक्षा करावी आणि सज्जनांची पाठराखणी करावी. अशा प्रकारे परमेश्वराच्या नावांचे अर्थ जाणून घेऊन परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आपले गुणकर्मस्वभाव बनविण्याची धडपड करणे हेच परमेश्वराचे नामस्मरण होय.