पान:मराठी रंगभुमी.djvu/160

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४२
मराठी रंगभूमि.


मनावर उमटत नाहीं. यापेक्षा ' जरठ-कुमारी-विवाहापासून काय दुष्परिणाम होतात ' एवढाच हेतु धरून नाटक रचलें असतें तर अधिक चांगलें झालें असतें. याखेरीज कालाची एकवाक्यता नसणें वैगरे किरकोळ दोष बरेच असल्यामुळे यांत पुष्कळ विसंगतता उत्पन्न झाली आहे. यांतील व्यक्तींचे स्वभाव व गुणावगुण यांकडे लक्ष दिलें असतां नायक अथवा मुख्य पात्र जें कोदंड तें बनविण्यांत अनेक चुका झाल्या आहेत. कोदंड हा आजन्म अविवाहित राहण्याचा संकल्प करून आपल्या उपदेशानें जरठ-कुमारी-विवाहासारख्या घातुक चालीपासून लोकांस परावृत्त करण्याचा प्रयत्न करितो, हें पाहून त्याच्या या उदात्त स्वभावाबद्दल प्रेक्षकांवर सुपरिणाम होऊन त्याबद्दल त्यांची पुज्यबुद्धि होऊं लागते न लागते, तोच पुढें क्षणभरसुद्धां विचार न करितां एखाद्या ढोंगी ब्रह्मचा-याप्रमाणें ऐन वेळीं लग्गा साधून तो शारदेचें पाणिग्रहण करितो हें पाहून पूर्वीची झालेली पुज्यबुद्धि नष्ट होऊन उलट त्याबद्दल तिटकारा मात्र जास्त उत्पन्न होतो. यापेक्षां कोदंडाला अविवाहित ठेवून शारदेचें दुस-या कोणाशीं तरी लग्न लावून दिलें असतें तर फार बरें झालें असतें. आपली तुमडी भरली म्हणजे झालें, मग त्याकरितां हवें तें करणारा मध्यस्थ भद्रेश्वर दीक्षित, द्रव्याच्या आशेनें पोटचा गोळा विकणारा कांचनभट, वृद्धावस्थेत लग्नांकरितां उत्सुक