हें पाहण्याकडे प्रेक्षकांचें लक्ष गेल्याशिवाय राहत नसे. तसेंच, शेवटीं तानेच्या फिरकीबरोबर ते आपल्या आंगाभोंवतीं अशी एक गिरकी मारीत कीं, तानेचा वेग आणि गिरकीची गती हीं एकाच वेळीं कुंठित होऊन लोकांत हशाच हशा पिके. शेवटच्या अंकांत शकाराचीं सर्व दुष्कृत्यें उघडकीला येऊन त्याला शासन करण्याकरितां जेव्हां बांधून आणितात व त्याची शेंडी धरून जेव्हां त्याला मार देतात तेव्हां हे गृहस्थ दुमूर्ख आणि आंबट अशा प्रकारचा विलक्षण चेहरा तर करीतच असत, पण त्याबरोबर उपटलेली शेंडीही ते तशीच ताठ करीत व तींत जणूं काय सायाळीच्या कांट्यासारखीच शक्ति भरली आहे, असें ते भासवीत! ही कंपनी रा. खरेकृत रामराज्यवियोग नाटकाचे पुढील दोन अंक करीत असे. त्यांत रामाचा वनवास, कैकयीचा शोक आणि भरतभेट, हे प्रसंग फारच चांगले साधले असून त्या वेळची पद्येही सरस आहेत. एकंदरींत ही कंपनी त्यावेळीं चांगली नांवाजल्यापैकीं होती यांत कांहीं संशय नाहीं.
त्या वेळेस 'किर्लोस्कर अनुयायी,' 'पडळकर' वगैरे आणखी दोन तीन नाटककंपन्या संगीत खेळ करीत असत व त्यांनीं साधारणपणें किर्लोस्कर, डोंगरे आणि नाट्यानंद या कंपनींच्या खेळांचेंच थोडंबहुत अनुकरण चालविलें होतें. मि. दादाभाई अपू या पारशी