पान:भूमी आणि स्त्री.pdf/२१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

देवीतुळजा
भावई तुळजा
देवाच्या मागती
गोंधळ घालती
आई बसली नवरात्री
दहा दिवसांची भरती
दहा दिवसांची भरती
आल्या आल्या मांगनी जोगनी
हाती कुक्कांचं करंड
भांग भरीला मोत्यानं
पाटील पांड्या मिळोनी
शिलंगणा जाती
धानाचे तुरे नेती
म्होर मशाली जळती

 नवरात्र खरिपाच्या पिकांचे स्वागत आणि रबीच्या बियाण्याची उगवणशक्ती मोजणारी प्रयोगशाळा आहे. पूर्वी शेतातील परिपुष्ट निरोगी कणसे पक्क झाल्यावर फडक्यात अलगद बांधून आळ्याला अधांतरी बांधून ठेवीत. अशा कणासांचे दाणे काढून ते नवरात्रात मातीत मिसळून त्यावर मातीचा घट मांडतात. मृत्तिकेच्या घटातून योग्य तऱ्हेने बियाण्याला पाणी मिळते. घटातून ते झिरपते. नऊ दिवसांत त्यातून अंकूर फुटतात. ज्या बियाण्याचे अंकुर रसरशीत, जोमदार असतील ते पीक त्यावर्षी चांगले येणार असा आडाखा बांधला जातो. अशी श्रद्धा लोकमानसात आहे. हे अंकुर डोक्यात खोवून सायंकाळी शिलंगणाला जातात. ते प्रसाद म्हणून खातातही.
 कोजागिरी : कोण आहे जागे? -
 दसऱ्यानंतरची पौर्णिमा कोजागिरीची. या दिवशी पार्वती घरादारातून हिंडते, शेताभातातून हिंडते आणि विचारते, कोजागर्ती ? कोण जागे आहे ?

२१२
भूमी आणि स्त्री