महाराजा सयाजीराव गायकवाड हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक पथदर्शक राज्यकर्ते होते. त्यांनी आपल्या ५८ वर्षांच्या कारकिर्दीत प्रशासनाच्या प्रत्येक क्षेत्रात गुणवत्तापूर्ण कामाचा 'भारतीय मानदंड' तयार केला. हा मानदंड तयार करत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाला ज्ञान, गुणवत्ता आणि शिस्त यांचे अधिष्ठान दिले. त्याचप्रमाणे योग्य ठिकाणी योग्य व्यक्तींची निवड अतिशय काळजीपूर्वक केली. निवड केलेल्या लोकांना गुणवत्तापूर्ण कामासाठी पुरेसा अवकाश दिला. महत्त्वाचे म्हणजे या अधिकाऱ्यांच्या गुणांची पारख करून त्यांच्या क्षमतांचा विकास होईल असे धोरण राबवले. अधिकाऱ्यांना कामातील शिस्तीबरोबर अभ्यासाची आणि वाचनाची सवय लावली. परिणामी त्यांच्या नियमित कामाबरोबरच त्यांच्याकडून अनेक क्षेत्रात समाजोपयोगी कामे झाली. सयाजीरावांच्या सहवासात आलेले अनेकजण चांगले वाचक झाले. त्यांनी उत्तम वैयक्तिक