पान:निर्माणपर्व.pdf/102

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उद्या इंदिरा गांधींची भूमिका बदलली, तर चव्हाणांची भूमिकाही बदलल्याशिवाय राहणार नाही. कारण चव्हाणांची अशी खास, वेगळी, स्वतंत्र व आग्रही भूमिकाच नसते. उजव्या कम्युनिस्टांच्या सहकार्याबाबत चव्हाणांनी व्यक्त केलेल्या मताबद्दल म्हणूनच आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. कारण ते आज इंदिरा गांधींचे मत आहे, बाईंचे सध्याचे ते धोरण आहे. उद्या बाई बदलल्या तर यशवंतरावही बदलतील, हे निश्चित. कारण आजवरची यशवंतरावांची, ही, राजकारणात हमखास यशस्वी ठरत आलेली ‘लाईन' आहे, ‘पॉलिसी' आहे. तर्कतीर्थ पडले विचारवंत. त्यामुळे त्यांनी जयप्रकाशांच्या चळवळीला योग्य ते महत्त्व देण्याचे आवाहन केले. पण चव्हाणांची बात निराळी आहे. त्यांना हे सत्तेपलीकडचे जनमानसाचे प्रवाह ध्यानात घेण्याची आवश्यकताच काय ? त्यांनी आपले सत्तेचे बुरूज या निमित्ताने पक्के करून घेतले हे त्यांच्या आजवरच्या लौकिकाला साजेसे असेच आहे. नवीन काही नाही.



 पण एक गोष्ट खरी. चव्हाणांच्या या धोरणामुळे महाराष्ट्रात सुस्थिरता राहिली हेही नाकारून चालणार नाही. महाराष्ट्रातील सत्तांतरेही त्यामुळे तुलनेने खूपच सुरळित व समजुतीच्या वातावरणात पार पडली. संघर्ष फारसे टोकास गेले नाहीत, आतल्याआत तडजोडी होऊन मार्ग निघाले. अर्थात या सुस्थिरतेलाही किती महत्त्व द्यायचे हा प्रश्न आहेच. सुस्थिरता कशासाठी हा खरा प्रश्न आहे. शेतीक्षेत्रात नाईकांसारखा शेतीप्रेमी मुख्यमंत्री असूनही महाराष्ट्र प्रगती करू शकला नाही हे इंदिरा गांधींनी पुण्यात येऊन सांगेपर्यंत कुणाला माहितच नव्हते. उद्योगधंद्यांचे काय झाले ? नासिक-पुणे-मुंबई या त्रिकोणाबाहेर उद्योगधंदे किती निघाले? उत्पादन वाढले का? बेकारी कमी झाली का? अशा मूलभूत पातळीवर महाराष्ट्राच्या सुस्थिरतेची चिकित्सा एकदा व्हायला हवी. सुप्रसिद्ध चव्हाण-दांडेकर (वि. म.) वादात रागवारागवी फार झाली. चिकित्सा व समालोचन झाले नाही. आतापर्यंतची वाटचाल चुकली असल्यास नवी वाट कशी असावी याबद्दलचा थंड, शास्त्रशुद्ध विचार झाला नाही. असा विचार केल्यावर जे उत्तर निघेल ते खरे चव्हाण कालखंडाचे मूल्यमापन. नाहीतर सुस्थिरतेचे उगाचच स्तोम माजत राहील आणि बदलाचे वारे येईनासे होतील.

 जयप्रकाश चळवळीचा तरी दुसरा अर्थ काय आहे ? आज, येथील जनमानसात, बदल हवा अशी तीव्र जाणीव निर्माण झालेली आहे. जयप्रकाश या जाणीवचे प्रतीक आहेत. मंत्रिमंडळात बदल करून किंवा केवळ मुख्यमंत्री बदलून महाराष्ट्र या जाणिवेकडे डोळेझाक करणार आहे का ?

-७
यशवंतराव, तर्कतीर्थ आणि बदल । १०१