Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३२
प्रेम व श्रद्धा यांस अंत:करणसिंहासनावर अभिषेक करा !

धर्मी आहे. हा थोर देशभक्त म्हणाला 'मी प्रथम जपानी आहे; नंतर ख्रिस्ती आहे.' 'I am a Japanese first and a Christian afterwards.' हे शब्द आपल्या देशांतील लोकांनी हृत्पटावर खोदून ठेवून, तदनुरूप वागण्याचा शक्य तो प्रयत्न केला पाहिजे. आपल्या प्रेमसिंधूंत सर्व हिंदुस्तानच्या जनतेस डुंबण्यास अवकाश पाहिजे. या गोष्टी आपणांस अशक्य वाटतात काय? कल्पना-साम्राज्यांत, रामाच्या राज्यांतच या गोष्टी सुसाध्य अशी आपली दृढ कल्पना झाली आहे काय? झाली असेल तर सर्वच ग्रंथ आटोपला म्हणावयाचा! हिंदुस्तानास जगाच्या संस्कृतींत एक महत्त्वाचे कार्य करावयाचें आहे, आणि त्यासाठीच तो जगला आहे; व जगणार आहे. तें कार्य कोणतें? तर जगाला प्रेम आणि सत्य यांचा धडा द्यावयाचा; आध्यात्मिक ज्ञान सर्वांस शिकवावयाचें. रामतीर्थ, विवेकानंद यांनी हेंच उच्च रवानें व उल्हासाने सांगितले. रानड्यांनी आपल्या व्याख्यानांतून हीच इच्छा पुनः पुनः प्रदर्शित केली आहे. आशा आणि श्रद्धा यांना अंतःकरणांत पट्टाभिषेक करा. आशा अमर असावी. निराशा आणि अडचणी या कोणाच्या मार्गात येत नाहींत? सर्वांच्याच मार्गांत येतात. अशाही वेळीं आपण आशापूर्ण राहून योग्य मार्गानें गेलें पाहिजे. परमेश्वरावर दृढ भरवसा ठेवून आपल्या पवित्र ध्येयासाठी झटले पाहिजे. समाजाची सर्वांगीण उन्नति व्हावी एतदर्थ आपणांमध्ये नैतिक बळ व शिस्त उत्पन्न करणें फार अगत्याचें आहे. गोपाळरावांचें प्रत्येक वेळीं सांगणे असें कीं, 'आपल्या लोकांमधून नैतिक सामर्थ्य कमी होत चालले आहे. ते मिळविल्याशिवाय अंगीकृत कार्यात जोम उत्पन्न करणें अशक्यप्रायच होय.' महात्मा गांधींची आज सुद्धां हीच सांगी आहे, की 'आपण अंतःकरणांतून परमात्म्याला- प्रेनाला आणि ऐक्याला- धुडकावून देऊन तेथे सैतानाला अधिष्टित केलें आहे.' म्हणून प्रत्येक देशभक्तानें, देशाच्या प्रत्येक कैवाऱ्यानें प्रथमतः लोकांत उच्च मनोवृत्तींचे बीजारोपण केलें पाहिजे. संकुचित भावना व क्षुद्र विचार यांची मगरमिठी आपणांस जर अद्याप सोडवितां येणार नाहीं तर आपला भाग्योदय कसा होणार? लोंकांस असा उपदेश करणें अपमानास्पद आहे असें कांहीं पुढाऱ्यांसही वाटतें. परंतु ही गोष्ट बोलून दाखविलीच पाहिजे, वरपांगी