प्रस्तुत चरित्र आपणांस या दृष्टीने पाहतां यावें. गोपाळरावांच्या चरित्रांत खळबळीचे व वादाचे अनेक प्रसंग आहेत. टिळक- गोखले वाद म्हणजे आधुनिक काळांतील एक भारतच होईल, आणि या वादांतील उभय पक्षांतील मुख्य प्रतिपक्षी दोघेहि जरी आज दिवंगत झाले आहेत तरी त्यांच्या भक्तानुयायांत या वादाची ही खणाखणी अद्यापि हि चांगलीच होते. टिळकचरित्रकार केळकर आणि रानडे चरित्रकार फाटक यांचा वाद ताजा आहे. 'टिळक-जीवनरहस्य'हि एका टिळक विरोधी लेखकाकरवीं प्रकट करण्यांत आलें आहे आणि कोणी तसलेच 'गोखले- जीवनरहस्य'हि लवकरच लिहिणार नाहीं म्हणून कशावरून? तेव्हां अशा स्थितींत त्रयस्थाच्या भूमिकेला म्हणावा तेवढा वाव अद्यापि झाला आहे असें म्हणतां येत नाहीं. अजून कांहीं काळ गेला पाहिजे.
पण एक चमत्कार मात्र सांगण्याजोगा आहे. गोपाळराव आणि बळवंतराव या दोघां देशभक्तांच्या मृत्यूनंतर त्यांच्या प्रेतयात्रा ज्या निघाल्या त्यांत दोघांनाहि राष्ट्रानें आपल्या हृदयांत केवढे उच्च स्थान दिले आहे याचा स्पष्ट पुरावा आपणांस आणि भावी पिढयांस मिळत आहे. आणि चमत्कारांतला चमत्कार असा की, राजनिष्ठ म्हणून गाजलेल्या मुंबईच्या नव्या राजधानीत राजद्रोही म्हणून शिक्षा झालेल्या टिळकांचा देह पडला आणि सरकारविरोधी म्हणून शापलेल्या पुण्याच्या जुन्या राजधानीत सी. आय. ई. म्हणून राजसन्मान मिळवलेल्या गोखल्यांचा अंत झाला! हा एक योगायोगच नव्हे तर काय? यावरून एवढे निर्विवाद होतें कीं, दोघेहि थोर लोकसेवक समाजानें वंद्य मानले आहेत. आतां तपशीलाच्या मुद्यांवर वादीप्रतिवादी केवढेही त्वेषाने तुटून पडून भांडोत! जनतेनें स्वयंस्फूर्तीनें शिक्कामोर्तब केलेली या दोघां वंद्य पुरुषांची थोरवी कोणासही हिरावून घेतां येणार नाहीं! त्या थोरवीच्या स्वरूपासंबंधानेही जरी मतभेद होईल तरी हे लहानमोठे मतभेदाचे मुद्दे जशी अधिक चर्चा होईल व आपण जरा पुढे जाऊं तसे स्पष्ट होतील. अद्यापि त्रयस्थास त्या संबंधानें निर्णायक बोलण्याची वेळ आलेली दिसत नाहीं. मात्र मागें सांगितल्याप्रमाणें या थोर पुरुषांच्या संबंधानें 'आठवणी', चरित्रे, चर्चा, अधिकाधिक प्रसिद्ध होत आहेत व त्यावरून तो काळ लवकरच येईल अशी आशा वाटते.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/१४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७
