पान:तिच्या डायरीची पाने.pdf/९७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बारावीला असताना गावात नव्याने रुजू झालेल्या, बँकेत अधिकारी असलेल्या तरुणाने तिच्या वडिलांना भेटून तिला मागणी घातली. देखणा तरुण, घरदार, शेतीवाडी, हजारांच्या घरातला पगार. सारे कसे छान… मनपसंद. घरी चालून आलेले स्थळ, चित्राचे त्या तरुणाशी थाटात लग्न झाले. सहा महिने सहा क्षणांसारखे भुर्रकन उडाले. दिवाळीतले तेलकट खाण्याचे निमित्त झाले. ताप आला, तो हटेना आणि ब्रेन ट्युमरचे निदान झाले. लग्नाला वर्ष होण्याआधीच तरणाताठा जीव उडून गेला. सासरच्या मंडळींनी चित्राला पांढऱ्या पायाची ठरवून घरात घेतले नाही. चित्राने आता बी.ए.च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा दिली आहे. तिने ठरवून टाकलेयं, ती कॉम्प्युटर शिकणार आहे. अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे.
 '... चार दिवस होस्टेलमध्ये रहावे तशी सासरी राहिले मी! त्यांचा … प्रवीणचा सहवास मला मनापासून आवडे. पण तो तरी किती दिवस लाभला? जेमतेम चार महिन्यांचा! परिकथेतला राजकुमार स्वप्नात येऊन घोड्यावर बसून निघून जातो… तसेच सारे. त्याआठवणींवर आयुष्य कसे निभणार? मला खूप शिकून अधिकारी व्हायचेच… बघू, जमलं तर कलेक्टरसुध्दा!!'
 चित्राच्या सहवासातून सुनीताला खूप काही मिळाले होते. आपल्यात काहीही कमी नाही. विवाहानंतर काही महिन्यात रमेशचा भूकंपात झालेला मृत्यू, हा केवळ योगायोग आहे. त्या मृत्यूला आपण जबाबदार नाही, याची जाणीव तिच्या मनात नकळत रुजली होती. त्यातून तिच्या बोलण्यात, चालण्यात, विचार करण्यात आत्मविश्वास आला होता. सुसूत्रता आली होती.

 भूकंप होऊन सहा वर्षे उलटून गेली आहेत, तेथील जनजीवन आता स्थिरावले आहे. सुनीता सामाजिक प्रशिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात शिकते आहे. पदवी परीक्षा संपल्यावर एका सामाजिक संस्थेत तिला नोकरी मिळणार आहे. गेल्यावर्षी पावसात भिजल्याचे निमित्त होऊन,

९२
तिच्या डायरीची पाने