पान:तिच्या डायरीची पाने.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

न्हायाचं न्हाई… पांढऱ्या पायाची, आमच्या घरात नको…” सासूचा त्रागा संपणारा नव्हता. सुनीच्या सासरेबुवांनी तात्यांना बाजुला नेऊन काही सांगितले. घोटभर पाणीही न घेता सुनीताला तावशीगडला वेस ओलांडावी लागली.
 सुनीचे माहेर शिंगणगांव लातूर - उमरगा रस्त्याच्या डाव्या बाजूला. किल्लारी पासून अवघ्या सात - आठ कोसावर निसर्गाची करणी अशी की, रस्त्याच्या डाव्या बाजुला धक्का बसला. पडझड झाली, पण माणसं गाडली गेली नाहीत. उजव्या बाजुची गावंच्या गावं मातीत गाडली गेली. सास्तूर, किल्लारी, मंगरुळ, किल्लारवाडी अशी लातूर - धाराशिव जिल्हयातील साठ अेक गावातील हजारो माणसे जमिनीत गाडली गेली होती. शिंगणगावातल्या घरांना धक्का जरुर बसला, पण वाड्यांचा दगड ही हलला नव्हता.
 शिंगणगावात आल्यापासून सुनीच्या अवतीभोवती मोठीमाय राही. तिला वाटे की पोरीला शिकायचं होतं, लगीन करायला राजी नव्हती. पण मोठीमायनेच हेका धरला, नातीचं लगीन लवकर करा म्हणून. सुनीचे तात्या वारावी पास झालेले. कष्टाळू शेतकरी. पोरगी चांगले गुण घेऊन पास होतेय, इंग्रजीत पक्की आहे याचं त्यांना कवतिक होतं. पण आईच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. या सगळ्याची मोठी मायला जाणीव होती. तिला मनोमनी खंत वाटे की, सुनीच्या दुर्देवाला तीच जबाबदार आहे. डोळे मिटायच्या आत सुनीला मार्गाला लावले पाहिजे, असा ध्यास तिच्या मनाने घेतला. पण सुनी ना कोणाशी बोलणार ना कुणाकडे जाणार. कसेबसे दोन घास खाई नि कुठे तरी एकटक बघत नुस्ती बसून राही. सुनीचे पुढचे जीवन चांगले करायचे म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर मात्र मोठीमायजवळ नव्हते.

 भूकंप झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून अवघ्या जगाचे लक्ष किल्लारीकडे वेधले. शेकडो संस्था मदतीचा हात घेऊन या भागात आल्या. धान्य, भांडीकुंडी, कपडे, पैसे यांचा ओघ नव्हे तर, पाऊस या भागावर कोसळत होता. पहाता पहाता सहा महिने होऊन गेले. काही सेवाभावी संस्था या भागातील मुलांसाठी, स्त्रियांसाठी काम करु लागल्या. त्यांच्या मनातील दुःख कमी व्हावे, मनाला बसलेल्या धक्क्यापासून त्यांनी सावरावे, दैनंदिन जीवन

८६
तिच्या डायरीची पाने