नातीवर तरी फेकायचेस. चार दिवस रडलो असतो नि गप बसलो असतो... आता जलमभर पोरीला रडत बसायचं आलं. पांढऱ्या कपाळाची नात पाहण्यापरीस मला न्ये गंऽऽ."
सुनिता क्षणभर भांबावून गेली आणि थोडं थोडं डोक्यात उलगडायला लागलं. रमेशच्या मृत्यूच्या कल्पनेनं तिचा जीव घाबराघुबरा झाला. तिने तात्यांकडे पाहिले, ते रुमालात तोंड खुपसून रडत होते. आईला बंडूनं घट्ट धरुन ठेवलं होतं आणि तिला काय उमजायचे ते उमजले. तावशीगडाला जाताना जागोजाग दिसणारी माणसांची गर्दी. इथे तिथे उभ्या असलेल्या गाड्या. विस्कटून गेलेली घरं... गावं... भूगोलाच्या पुस्ताकतला भूकंप तिच्या उंबरठ्यात उभा राहिला होता.
घरापाशी जीप थांबली, घर कसले? दगडमातीचा ढीगच. नाही म्हणायला मागच्या बाजूला एक विटांची खोली, नव्या नवरानवरीसाठी बांधली होती. वर पत्रे टाकलेले. ती तेवढी जेमतेम उभी होती. आत्याबाई, मामंजी यात्रेला गेलेले, म्हणून रमेश आणि सुनिता बाहेरच्या दगडी ओसरीत झोपत; आणि त्या दगडांनीच घात केला होता.
एकुलता एक मुलगा, चार पोरींच्या पाठचा. लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यात दगडाखाली चेचून मेला. आई - वडिलांच्या बहिणीच्या दुःखाला पारावार नव्हता. गावातले आणखी बरेचजण खर्चले होते. त्यांत बाया आणि पोरांचीच भरती जास्त होती. गावांतील तरुण मंडळी उमरग्याचा लावण्यांचा कार्यक्रम बघायला गेली होती, आणि वडिलधारी माणसं शेतात होती. सुगीचा हंगाम जवळ आलेला. मूग, उडीद घरात येऊन पडला होता. तीळ, साळ, सूर्यफूल - पिवळा, शेतात उभे होते. त्यामुळे घरातील वडिलधारे पुरुष रानात झोपायला जात. त्यामुळे दोन म्हातारे पुरुष आणि तरणाबांड रमेश सोडला तर बाकी बाया आणि लेकरंच जमिनीत गाडली गेली होती...
तात्यांनी मनावर दगड ठेवून सुनीताला हात देऊन खाली उतरवले. मोठीमायने तिच्या अंगावरची शाल नीट केली. डोक्यावरचा पदर जरा पुढे ओढला. ती घरात शिरणार इतक्यात तिची सासू अंगात वारं शिरल्यागत