की नको ते रोगही जडले असावेत, दोन दिवसात इथे खूप रमली. बापाचा पत्ता देऊन म्हणाली की, त्याना बोलवा. पहावसं वाटतंय. पोलीस नियमानुसार तिला औरंगाबादला घेऊन गेले. सुधारगृहात ठेवले. पण एक दिवस बाई दिलासात हजर. तिला आमच्याजवळ रहायचे होते. पण ती चार दिवसापेक्षा एक दिवसही इथे राहू शकली नाही. संध्याकाळ झाली की तिचे डोळे लकाकू लागत. टग्या पोरांच्या फेऱ्या आसपास वाढल्या. इथली शिस्त तिला मानवेना. शेवटी . तिची रवानगी परत पोलिस स्टेशनमधे केली. आणि मनाची एक खिडकी बंद करून घेतली. नंतर चारच दिवसांनी तिचे वयस्क वडील काठी टेकीत संस्थेत आले. ही त्यांची सर्वात धाकटी लेक, आई तान्हेपणीच वारली. अति लाडामुळे शाळेत गेली नाही. घरात भाऊभावजया. घरी काम नाही की अभ्यास नाही. वाढत्या वयात मायेची पाखर न मिळाल्याने ती बेफाम बनत गेली. मामाच्या आजारपणाच्या निमित्ताने शहरात आली, तिथून पळून गेली.
"बाई, तुमचं कार्ड मिळालं, वाटलं लेकरू डोळ्यांनी बघावं. ती काई वळणावर येण्यातली राहिली नाही. तिच्या भावांना न सांगता आलोय मी. पण भेट नशिबात नाही. चिमणीचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं की त्याला पुन्हा घरट्यात घेत नाहीत…" बोलता बोलता म्हाताऱ्याचा आवाज घुसमटून गेला.
अनेकजणी आल्या. पण या पोरीची आठवण झाली की मन आतल्या आत चिरत जातं. आपल्या मर्यादा खुपायला लागतात.
हे काम खूपदा चटकेही देतं. आपल्या आसपासची, सहकारी जनांच्या घरची प्रकरणे हाताळतांना जवळच्यांची नाराजी पत्करावी लागते. द्वेशही सहन करावा लागतो. घरच्या मुलांना, कार्यकर्त्या मुलींना त्रास सहन करावा लागतो. पण यास टोचत्या उन्हातही एक हलकीशी सरही सरसरून जाते. जेव्हा ती मदत केलेली महिला चोरून भेटते नि हात घट्ट धरून सांगते, "ताई, लई उपकार वाटून घेतलेत हो. माझ्या लेकरासाठी जिवंत रहायचं बळ दिलंत." अशा प्रसंगातून कर्ते सुधारक आणि बोलके सुधारक यांचेही दर्शन घडते.
शांता तीन मुलांची आई. लोकसत्तेतील मधुवंती सप्रेचा लेख वाचून तिचे पोस्टातील बंधू संस्थेत आले. तिच्या दोनही मुलांची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. शांता शिवणकाम, खडू, निर्धूर चुली बनविण्याचे तंत्र शिकली. इंग्रजीचा अभ्यास