पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१३२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पान ५
 सरूबाई एवडा महिना तुमी डायरी लिवा. पुडच्या महिन्यात ढायरी… नव्हं रोजनिशी मी लिहिनार.
 परवा आमी पुन्याला जाणार आहोत. तिथे बायांची लई मोठी मीटिंग आहे. शिबीर म्हनत्यात त्याला. सरू तूच नाव लिही त्याचं. लईच अवघड हाय. परिकता की काय मनतात खर! मी आज दिदीला विचारलं, "दिदी याचा मतलब काय? जरा सोपं करून सांगा की," तशी मनाल्या,
 "अग, खूप बाया आहेत, ज्यांना नवऱ्यानी, सारच्यांनी टाकलंय. घरातून हाकून लावलंय, अशा बायांना एकटं रहावं लागतं. कुणाच्या संग लेकरं असतात. मग खूप अडचणी येतात. लोक वाईट नजरेनं पाहातात. कुठे काम मिळत नाही. तर अशा बायांनी एकाजागी जमायचं आहे. एकमेकींना आपापलं गबाळ मोकलून दावायचं. त्याचा इचार करायचा नि त्यातून काही वाट सापडते का ते पहायचे."
 तशी मी चटकनी म्हणाले,
 "दिदी, तो अवघड शद्व कशापायी वापरायचा? चक्, टाकलेल्या बायांची मीटिंग म्हणा की!" तशी दिदी म्हणाल्या,
 "सावू, तू शहाणी आहेस. तुला जे कळतं ते खूपदा आम्हालाही कळत नाही. पुण्याच्या शिबिरात तुला भाषण करायचंय. तयारी कर. काय बोलायचं ते मनाशी जुळवून ठेव. तू, सरू नि शहनाज, तिघींना चलायचं"
 शहनाज कालच हितं आली. औरंगाबादेहून. पन पुण्यासाठी तिचा नंबर लागला. शान्ता, पद्मीन संगमनेराला जाणारेत. काय बोलावं बरं पुण्याला? उद्या आमी समद्या एक गट्टा बसून काय बोलायचं ते ठरवनार आहोत. पुन्याच्या सभेत बोलायचं म्हंजी भीती वाटनारच की! दिदी छान बोलतात. पुंगी वाजल्यागत वाटतं, निसतं गुंग होतं मन.
 मी पन मनातल्या मनात बोलून पहाणारेय. जमलंच की, न जमाया काय झालं? दिदी माणूस आहेत. तशी मीबी मानूस हाय. मन घट्ट कराया हवं. परयत्न कराया हवा.

 आताशा मला कुन्नाकुन्नाची आठवन येत न्हाई. इथं मन गुतायलंय. वाटतं हितनं कुठच जाऊ नाही.

सावितरा
१२७