पान:तिच्या डायरीची पाने.pdf/११३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

काय कमी नाही. पैसा अडका भरपूर आहे." तारूमावशी जयपूरहून आलेल्या तिच्या भावाला आपला बेत सांगत होती.
 "वर्षात लेकरू पन झालं. पण ते आहे डोंक नसलेलं, अशक्त. केव्हापण मरेल. नाही तर मलाच काय तरी करावं लागेल. दोगांचा काटा काढावाच लागेल." हे सारं ऐकतांना लिलीच्या अंगावर काटा आला. हीच तारूमावशी लग्नाआधी हौशीनं नवी साडी नेसायला द्यायची. बाजारातून मिठाई, लस्सी, मिसळ आणून खाऊ घालायची. तीच आता अशी वागतेय? बाळाच्या मृत्यूच्या कल्पनेने लिली विलक्षण धास्तावली. आणि एका संध्याकाळी ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडली खरी. समोर बारा वाटा मोकळ्या होत्या. पण एकाही वाटेवर घर नव्हतं... डोक्यावरून हात फिरवील असं माणूस नव्हतं. एक वाट तिला दिसली आणि ती थेट एस. टी. स्टँडवरच्या दिशेने चालू लागली. पण चढणार कोणत्या एस्.टी.बसमध्ये… बाळाला पदराखाली घेऊन तशीच बसून राहायची. पोटात अन्न नाही. जवळ एक पिशवी नि स्टीलचा ग्लास. दोन दिवस असेच गेले. एस्.टी. स्टँडवरच्या लोकांच्या नजरेत हे मायलेकरू बिन रस्त्याचं आहे हे लक्षात आलं असावं. तिसऱ्या रात्री पोलिस आले आणि त्यांनी लिलीची रवानगी ठाण्याच्या महिला स्वीकारगृहात केली. अवघ्या चार दिवसात ते मूल लिलीच्या मनाला धक्का देऊन कायमचे दुरावले.

 तेव्हापासून लिलीचे ओठ जणू गच्च मिटून गेले. पण डोळ्यात एकाकी… असहाय चमक आली. तीन वर्षे त्या स्वीकारगृहाचे नियम पाळीत. तिथे राहिल्यावर तिची रवानगी लातूरच्या स्वीकारगृहात झाली. लातूरच्या स्वीकारगृहातील बहुतेक महिला गुन्हेगारी प्रवृत्तीची शिकार असलेल्या वा होणाऱ्या कौटुंबिक त्रासामुळे मानसिक संतुलन बिघडलेल्या महिला असाव्यात. तिच्या आणि पार्वतीच्या बोलण्यातून हे लक्षात आले. तसेच पार्वतीला दिलासात घेऊन येणाऱ्या स्वीकारगृहाच्या व्यवस्थापिकेच्या मनातील खंतही जाणवली. लिली या व्यवस्थापिकेच्यापूर्वी काम करणाऱ्यांच्या घरी मदत करत असे. त्यामुळे तिचा वेळ बरा जाई. नव्या व्यवस्थापिकाबाईना वाटे की या अबोल, शहाण्या आणि वंचित मुलीला जगाच्या मुख्य धारेत सहभागी होण्याची संधी मिळावी. त्या हेतूनेच त्यांनी पार्वती आणि लिलीला दिलासात आणले.

१०८
तिच्या डायरीची पाने