पान:तिच्या डायरीची पाने.pdf/१००

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भरून ठेवायचे काम सुधीकडे असे. सकाळी थेंबभर तेलाची फोडणी करून त्यात बदाबदा पाणी ओतायचे. मिठाचा खडा टाकायचा. पाण्याला खळाखळा उकळी आली की त्यात वाळलेले तुकडे टाकायचे. एक वाफ आली की असा खमंग वास येई की तोंड पाण्याने भरून जाई. हे तुकडे म्हणजे रोजचा सकाळचा जन्मसावित्री नाश्ता. त्यात बदल नाहीच.
 भाऊ, बाबू त्याचे नाव. तोही शेळ्यामेंढ्या राखायला जाई. सीताफळाचे दिवस आले की अख्खे घर सीताफळाच्या टोपल्या आंब्याला म्हणजे अंबाजोगाईला विकायला नेण्यात गुंतत असे. शंभर फळाची एक टोपली आठ दहा रुपयांना विकली जाई. हे रुपये बाजूला पडत. त्यातून वर्षाचा कपडालत्ता आणावा लागे. सुधीला आठवते तेव्हापासून ती शेण गोळा करून, त्याच्या गोवऱ्या लावण्याचे, थापटण्याचे काम करी. कुणाची का जनावरे असेनात, त्यांच्या मागेमागे धावायचे. दिवसभर शेण गोळा करून घरासमोर साठवायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गवऱ्या थापायच्या. आंब्याच्या गवळणी दर मंगळवारी येत नि आठवड्याला रुपया पदरात येई. मग तो मधल्या घरातल्या कोनाड्यातल्या बारक्या गाडग्यात ती ठेवी नि वरून दगड झाकी.

 बाप म्हणे, "सुधीचा हुंडा सुधी साठवतीया."
 डोंगरात दुष्काळाचाही सुकाळ असे. कधीतरी वेळेवर पाऊस यायचा. दोन वर्षे लागोपाठ दुष्काळ येई. त्या साली तर उलटी गंगाच वाहिली. दोन महिन्यात शंभर इंच पाऊस झाला. नद्या भरभरून साहू लागल्या. शेते बदबदून डबडबली. पेरलेले दाणे सडून गेले. जरा ऊन पडले नि हाहाकार आणखीनच वाढला. धड दिसणारे वाडेही कोसळू लागले. दगडमातीच्या घरात राहाणाऱ्यांचे हाल तर काय सांगावेत? उन्हाने माती वापसली. फुगली नि घरे धडाधड कोसळली. डोईवरचे छप्पर उडाले नि पायाखालची जमीनही बुडाली. पण पोटातली भूक कुठे उडून जाणार? गांवातल्या माणसांचे जथेच्या जथे मुंबई-पुण्याच्या रस्त्याने धावू लागले. गावात फक्त लेकुरवाळ्या बाया आणि म्हातारी माणसे. सुधीचा भाऊ जेमतेम सोला वर्षाचा होता. त्यालाही मुंबईची ओढ लागली. म्हातारा बाप हात जोडून विनवी, "बाळा रे, एवढी सुरी म्यानात घालून टाक. मग कुटं बी जा. पन घरात शानी पोर टाकून नगं जाऊ. मी म्हातारा मानूस. माझं काय चालणार? पोरीसाठी

सुधामती
९५