पान:केकावलि.djvu/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४३ ) आहे. १००-१०१ मधील भगवत्कथेचे वर्णन फार बहारीचे आहे. १०३-१०७ या पांच केकांत कथेची मोहिनीशी तुलना करून कथेला श्रेष्ठत्व दिले आहे. तो भाग फार वाचण्यासारखा आहे. १०६ तील व्यावहारिक दृष्टांत फार सरस व समर्पक आहे. १०९ व्या केकेंत गंगेचे सुरेख वर्णन केले आहे. त्यांतील पहिले दोन चरण तर फार सुरेख वठले आहेत. १११-११५ केकांत भगवत्कथेचे माहात्म्य आणखी वर्णिले आहे. ११२-११५ तील कथामहत्वासंबंधी दिलेली नारदाची साक्ष फार महत्त्वाची आहे. केका ११४ यांत 'योगादि साधनांपेक्षां भगवद्गुणवर्णनच अधिक श्रेयस्कर' म्हणून तेंच आपल्या गाण्यांत यावे' असा देवर्षि नारदांचा अभिप्राय भक्तिमार्गाची थोरवी स्पष्टपणे सांगितली आहे व त्याच्या पुष्टयर्थ पुढील पद्यांत नारदाच्या पूर्वजन्मींच्या कथेचा उल्लेख केला आहे, तो सरस आहे. केका ११६-११७ यांत सत्संगतीचा महिमा समर्पक दृष्टांत योजून वर्णिला. त्यांतील वर्णन फार चटकदार उतरले आहे. या पुढील दोन केकांत पंतांनी परमेश्वरापाशीं जें वरदान मागितले आहे ते सर्व धर्माच्या, सर्व जातींच्या, लहानथोर, स्त्रीपुरुष अशा सर्व मंडळीने नित्य देवापाशी मागावें, इतकें तें अत्युत्कृष्ट व सर्वसाधारण आहे. केका १२० त भगवन्नामावली आपल्या मुखांत सदोदित राहो असा वर कवीने देवाजवळ मागितला आहे. सरतेशेवटीं मूल रडू लागले असतां आई जशी त्याच्या दुःखाने कळवळून त्याला कडेवर घेऊन समजाविते त्याप्रमाणे भववनी त्रितापात झालेल्या भक्तमयूरावर दयामृताची वृष्टि करावी म्हणून दयामृतघन परमेश्वराची कळकळीने प्रार्थना करून नटमयूराचा प्रियसख व गुरु जो दाशरथि राम त्याचें मांगल्यसूचकस्मरणपूर्वक कवीने ह्या ग्रंथाची इतिश्री केली. वर आम्ही 'केकावली'तील बहुतेक सुंदर स्थळे थो. डक्यांत स्पष्ट करून दाखविण्याचा यत्न केला आहे. हे व पंतांची इतर काव्ये वारंवार वाचून पाहणारांस प्रत्येक खेपेस त्यांतील जास्त खुब्या व सुंदर काव्यगुण आढळून येऊन पंतांनी आपल्या एका काव्यांत काढलेल्या पुढील उद्गाराच्या सत्यतेविषयी त्यांची पूर्ण खात्री होईल: . जसे होती देव प्रमुदित शचीनायकवनीं । तसे सारज्ञाते बुधजन मयूरेशकवनी.