पान:करुणादेवी.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "प्रेमानंद, किती येणार तुम्ही ? जा आता. जपा. तुम्ही मित्रप्रेमाचे कर्तव्य केलेत. नेहमी मदत केलीत. धीर दिलात. सल्ला दिलात. सत्पंथ दाखवलात. जा, किती याल ?”

 “ शिरीषला प्रेमपूर्वक प्रणाम सांगा. म्हणावे, जन्मग्रामाला एकदा भेट दे. ”

 “ सांगेन. त्यांना घेऊन येईन. राजाजवळ वर मागेन."

 प्रेमानंद परतला. करुणा करुणापर अभंग आळवीत निघाली. एकतारीच्या नादावर ती गात होती. चालण्याचे श्रम तिला गाणी म्हणायला सांगत. ती म्हणे.

 मंदिरात ती स्वयंपाक करी. एक भाग गायीला काढून ठेवी बाकीचे जेवे. ‘ शिरीष, हा शेवटचा तुझा ही घास,' असे उठताना म्हणे. मंदिरातील ओवरीत ती भजन करीत बसे. जाणारे येणारे ऐकत. भक्तिमय होऊन माघारे जात.

 एकदा एक मोठया नदीतून ती नावेत बसून जात होती. परंतु नाव धारेत सापडली. नावाडी नवशिके होते ! लोक घाबरले.

 “ बाई, तुमच्या देवाला तरी आळवा !” लोक म्हणाले.

 “ माझी कोठे आहे पुण्याई ?” करुणा म्हणालीं.

 “ म्हणा तर खरा अभंग !” कोणी आग्रह केला आणि करुणेने धावा म्हटला.

 “ देवा, धाव रे धाव. आम्ही नाव लोटली आहे. तू सुकाणू हातात घे. तू नसशील तर आम्ही मरू, तू असशील तर तरू, ये ये ये.

 “ आम्ही अभिमान टाकला आहे. आळस झाडला आहे. आम्ही भांडणे मिटवली आहेत. स्पर्धा थांबविली आहे. आम्ही सारे वल्ही मारीत आहोत. एकोप्याने कार्य करीत आहोत. तुझा आशीर्वाद दे. तू मार्ग दाखव. ये ये ये."

 “ वारा जोराचा आहे. प्रवाह जोरदार आहे. आम्ही पराकाष्ठा करीत आहोत. प्रभू, तुझी कष्टाळू लेकरे. अंत नको पाहू. ये ये ये."

 “ तो पाहा प्रभु आला. त्याने सुकाणू हाती घेतले. वल्हवणाऱ्यांना स्फूर्ती आली. प्रवाहातून नाव बाहेर पडली. आले, तीर आले. प्रभूची

यात्रेकरीण * ५९