________________
या सर्व पाश्र्वभूमीवर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या येथील मतिमंद मुलांसाठी बरेच केले असले तरी बरेच करायचे बाकी आहे. विशेषत: शासन व समाजाचा मतिमंदांच्या शिक्षण, प्रशिक्षण, सेवायोजन, उपचार इ. संबंधातील दृष्टिकोनात सुधारणेस भरपूर वाव आहे, हे मान्य करायला हवे. तेथील अशा सामाजिक संस्था शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलांना सामान्य (Normal) करून मुख्य प्रवाहात आणण्यावर अधिक भर देतात. आपणाकडे अशा संस्था दया नि दातृत्वाची स्मारके म्हणून विकसित होत आहेत, हे अधिक क्लेषकारक तर आहेच, पण या मुलांच्या भवितव्याचा विचार करता हे अमानुष आहे. याचा गांभीर्याने विचार करायची वेळ येऊन ठेपली आहे. अशा संस्थांचे जाळे आज भारतात केवळ महानगरपातळीवरच दिसून येते. ते भविष्य काळात शहर, गाव पातळीवर पसरविण्याची गरज आहे. ग्रामीण भागात आवश्यक जागृती अभावी विकासाची शक्यता असलेली मुले वेडी म्हणून उपेक्षिली जातात, हे विदारक सत्य आहे. त्यांच्या उच्चाटनासाठी प्रचार व प्रसार माध्यमे मोलाची भूमिका बजावू शकतील. प्रश्न आहे तो प्राधान्य देण्याचा. भविष्यकाळात ते मिळविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वंचित विकास जग आणि आपण/९९