अल्पायु, दीर्घायु, सचेतन, अचेतन,लहान मोठे,घन, द्रव, कठीण, मृदु असे अनंत पदार्थ निर्माण केले आहेत. प्रत्येक पदार्थ त्यांतील पंचतत्वाच्या अंशांना व रचनाविशेषाला अनुसरून, गुणधर्म, सामर्थ्य आणि आयुष्य किंवा टिकाऊपणा या बाबतीत मर्यादित असतो. काही पदार्थ नुसते स्थिर आहेत. काहींना गति आहे. काहींना वाढ आहे. काहींना आपल्या उन्नतीचे किंवा अवनतीचे ज्ञान आहे. सजीव पदार्थात वृक्ष वनस्पति यांची वाढ होते. जवळ असणा-या पोषक पदार्थातून त्या आपले पोषक अंश शोषून घेतात. पशुपक्षी प्रयत्न करितात. आणि मनुष्यप्राणि परमावधीची सुधारणा. आपण झालों कसे, वाढतों कसे, आपली शक्ति काय, ती वाढेल निदान क्षीण होणार नाही कशी, आयुष्य पूर्ण कसे उपभोगितां येईल, तें वाढेल काय, व आपल्याला सुख कसे होईल या सर्वांचा विचार करण्याची शक्ति याला आहे. सर्व सृष्टीतील पदार्थापासून आपल्याला काय सुख होईल हा मोठा विचार जणुं काय सृष्टीतील सर्व चराचर वस्तुमात्र परमेश्वराने या मनुष्य प्राण्याच्या चैनीची साधने म्हणूनच निर्माण केली आहेत. ते कसेंही असो. सृष्ट पदार्थाचा आपल्या सुखासाठी उपयोग करण्याच्या प्रयत्नांत त्याने यश मिळविले आहे इतकें खरें. अनेक प्रकारे शरीर विकृत होऊन दुःख वाटू लागल्यावर त्याचा परिहार करण्याच्या उपायांची तर अवश्यकताच आहे. ह्या कारणामुळे मनुष्यशरीर व इतर द्रव्ये यांच्या तत्वांचा विचार होऊ लागला. अशा रितीने रोगरूपी दुःखाचा परिहार होऊन नैसर्गिक गुण व पूर्ण आयुष्य आणि आरोग्यसुख कसें अनुभविता येईल याचा विचार ज्याने केला आहे तें वैद्यशास्त्र होय. प्राचीन ऋषींनी अशा प्रकारचा विचार ज्यांत केला आहे त्याला आयुर्वेद असें नांव दिले. व हा विचार करीत असतां सर्वव्यापी अशी जी काही मुख्य तत्वे दिसून आली, ती हे त्रिदोष होत.या तत्वांनीच शरीराची उत्पत्ति झाली व वाढ होते.
कोणताही पदार्थ पांचभौतिक आहे, ही गोष्ट सिद्ध झाल्यावर, हा पार्थिवाधिक पंचभूतांचा संयोग झाला कसा याचा विचार करताना प्रथम पार्थिव परमाणु एकत्र करणारी, परमाणु एकमेकांना चिकटवून त्यांना आकारता आणण्याला जी मुख्य कारण झाली, जिचे अभावी शरीराला शरीरत्वच आले नसते अशा प्रकारची श्लेषकशक्ती-परमाणूंना चिकटवून एकत्र करणारी शक्ती-हें एक मुख्य तत्व मानिले आहे. हे