पान:अंगारमळा (Angarmala).pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आवश्यक होते. मग, आम्ही 'वारकरी' या नावानेच सुरवात करायचे ठरवले. नाव मिळाले. बाबूलालचा छापखाना तयारच होता. कोणाच्या तरी ओळखीने पुण्याच्याच एका दैनिकाकडे असणारा जादा न्यूजप्रिंट आम्ही मिळवला. मोठी बाजी मारली असे वाटले.

 पहिल्याच अंकात (३ नोव्हेंबर १९७९) वारकरीच्या पहिल्या पानावर उजव्या बाजूस संत ज्ञानेश्वर व उजव्या बाजूस तुकोबांचे चित्र छापले. कारण, त्यांचे ब्लॉक छापखान्यात तयार होते. 'ॐ नमोजी आद्या' या ज्ञानेश्वरीतील पहिल्या ओवीच्या पूर्वार्धाने मी संपादकीय लिहिले. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संस्थापनेच्या काळी आणि त्याआधी महाराष्ट्राची परिस्थिती आणि वर्तमान परिस्थितीची समांतरता दाखवून दिली. बाबूलाल मोठा खूष झाला.

 त्यानंतर दर आठ दिवसांनी 'वारकरी'चा एक अंक काढणे म्हणजे मोठे दिव्य होऊन बसले. महाराष्ट्रातील माझ्या दौऱ्यांना त्या वेळी सुरवात झाली होती. ते सांभाळून गुरुवार किंवा शुक्रवारी चाकणला पोहोचायचे.

 चाकणच्या बाजारात ११-१२ वाजेपर्यंत तरी अंकाच्या प्रती पोहोचाव्यात म्हणून लेख घेऊन मी बाबूलालच्या घरी अंधारात पोहोचे. सगळीकडे सामसूम. पाच पन्नास हाका मारल्यानंतर बाबूलालची बायको उठायची, मला ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात नवऱ्याला हलवून जागे करीत म्हणायची, 'अहो, तुमचे सासरे आलेत, उठा लवकर.' काही वेळाने बाबूलाल खाली उतरायचा. जवळच्या छापखान्यात जायचो. खिळे जुळवायला कुणी असेल तर बरे, नाही तर कोणाला तरी आणून वेठीला धरायचे. माझा लेख जुळवून होईपर्यंत बाबुलाल आणि मी अंक भरण्यासाठी मजकूर तयार करण्याच्या खटाटोपाला लागायचो. माझे लेख आताच्या प्रमाणात थोडे कमी लांबीचे असत. बाबूलाल चतुरस्र सामग्री तयार करणारा. कधी विनोद, कधी-चुटके, कधी वात्रटिका, किस्से, पण या सगळ्या चुरचुरीत मामल्यात त्याने लिहिलेला जनावरांच्या बाजारातील अडत्यांच्या भाषेसंबंधीचा लेख सर्वत्र गाजून गेला. (जोड असर - शेतकरी संघटक : ग्रामीण अनुभूति विशेषांक : २६ जुलै १९८५) खरे म्हटले तर या लेखाला मराठी भाषेतील काही पुरस्कार मिळायला पाहिजे होता.

 १९८० चा फेब्रुवारी महिना आला. चाकणच्या आंदोलनास तोंड फुटले. कांद्याचा बाजार १३ पैशांपर्यंत पडलेला; पण शेतकऱ्यांमध्ये काही धाडसाची ठिणगी पडेना. आज शेतकरी संघटना दांडगी शक्ती आहे, तरी जागोजागी शेतकरी कच खातात. त्या वेळी तर शेतकरी संघटित होणे म्हणजे कुत्र्याचे शेपूट सरळ होण्याइतके कठीण अशी

अंगारमळा । ७८