पान:अंगारमळा (Angarmala).pdf/29

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "अशा परिस्थितीत मरण मागणे हा पळपुटेपणा आहे. तू बरी हो, घरी चल; मग मरायचे आहे असे सांगितले तर त्याचा विचार करता येईल. तू आत्ता मरायचे म्हणतेस तो तुझा खरा निर्णय कशावरून? जगण्याची तुझी खरंच इच्छा नसती तर भाजण्याच्या वेळी तू आपणहून अंगावर पाणी कशाला ओतून घेतले असतेस?" हे असले युक्तिवाद इस्पितळात खाटेवर पडलेल्या आईशी करणे यातली विक्षिप्तता आणि क्रूरता मला क्षणाक्षणाला जाणवत होती; पण माईला इतक्या स्पष्ट बोलण्याखेरीज चाललेच नसते. तीनचार तास थांबून मी टॅक्सीने मुंबईला जायला निघालो. संध्याकाळी तेथून विमान पकडून वर्ध्याला पोचायचे होते. १३ तारखेला वर्धा जिल्ह्यातला लक्ष्मीमुक्तीचा कार्यक्रम पार पाडायचा होता.

 तीन तारखेला झालेल्या अपघाताची बातमी कळल्यापासून आणि, विशेषत:, नागपूरला श्रेयाचा निरोप मिळाल्यापासून मनावर मोठे दडपण होते. ऐंशीच्या वर वय गेले. त्यात हा असला अपघात. यातून माई उठते की नाही याबद्दल शंकाच वाटत होती. इस्पितळात आज तिचा खणखणीत आवाज ऐकला आणि बराच धीर आला. डॉक्टरांनी मात्र परिस्थिती अगदी स्पष्ट केली.

 "वीस टक्के भाजणे, म्हणजे काही फार गंभीर नाही, पण ऐंशीव्या वर्षी वीस टक्के भाजणे ऐंशी अधिक वीस, शंभर टक्के भाजणे आहे. माईंना मधुमेह वगैरे नाही त्यामुळे जखम भरून येईल; पण दुसऱ्या काही अडचणी त्यातून उद्भवण्याची शक्यता आहे." थोडक्यात, एकूण प्रकरण वाटते तितके सोपे नाही; पण शेवट येणार असला तरी तो अगदीच काही आज उद्या, इतक्यात नाही एवढा तरी मनाला धीर आला.

 वर्ध्याला गेल्यापासून पुन्हा लक्ष्मीमुक्तीच्या कार्यक्रमाचा आणि निवडणुकीच्या प्रचाराचा धबडगा चालू झाला व २३ फेब्रुवारीला रात्री नांदेड जिल्ह्यात किनवट तालुक्यात या कार्यक्रमाची सांगता झाली. जवळ जवळ सतत ५० दिवस एकसारखा दौऱ्याचा, भाषणांचा कार्यक्रम चालूच होता. सर्वसाधारणपणे रात्री दीड-दोनपर्यंत झोपणे नाही आणि सकाळची पहिली सभा नऊदहापेक्षा उशिरा नाही. दोन सभांच्या मध्ये प्रवासात मिळेल तेवढाच विरंगुळा आणि आराम. बसल्या जागी बोटसुद्धा हलवावेसे वाटू नये इतका मी थकलो होतो; पण १२ तारखेला इस्पितळातून निघताना माईला आश्वासन दिले होते, की मी २५ तारखेस येईन. भावाबहिणींनाही सांगितले होते, 'तोपर्यंत तुम्ही सांभाळा, मग मी बघतो.' दौऱ्याचा धबडगा संपवून आता इस्पितळात बसणे शक्य होणार होते. १२ तारखेला निघताना डॉक्टर म्हणाले होते, "तुम्ही परत या, माईंच्या

अंगारमळा । २९