पान:अंगारमळा (Angarmala).pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कबूल केले. फोनवर मला ते म्हणाले, "शरदराव, मी ब्राह्मण जातीचा आहे, म्हणून माझी अशी प्रेतयात्रा निघाली." मी त्यांना ताबडतोब उत्तर दिले, "मेजर साहेब, तुमच्यात आणि माझ्यात पुष्कळ मतभेद आहेत. त्यांतील पुष्कळ मिटतील, काही मिटणार नाहीत; पण या बाबतीत तुम्ही सपशेल चूक आहात हे मी ठामपणे सांगू शकतो. ज्या ब्राह्मणाच्या मनात ब्राह्मणगिरीचा अहंकार नाही, त्याला दुजाभावाने वागवले जाईल हे मला पटणेच शक्य नाही. कारण माझा अनुभव अगदी वेगळा आहे."

 ब्राह्मण्याचा उल्लेख काही वेळा विनोदापोटीही होतो. एकदा कुणी एक सहकारी ठरल्या वेळेपेक्षा खूप उशिरा आला. जवळच्या नातेवाइकाच्या बाराव्याला जावे लागल्यामुळे त्याला उशीर झाला. तो सांगू लागला की , "काय करावे? काही झाले तरी कावळा पिंडाला शिवेचना." मग आसपासची सगळी मंडळी या विषयांवरील त्यांचे त्यांचे अनुभव सांगू लागली. कोणाकोणाची काय इच्छा राहिली होती, ती इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिल्यावरच कावळा पिंडाला कसा शिवला, याचा व्यक्तिगत अनुभव सांगण्याची एकच गर्दी उसळली. मला मोठे आश्चर्य आणि कौतुक वाटले आणि मी म्हटले, "माझे पूर्वज खरेच भारी असले पाहिजेत. त्यांनी तुमच्या पूर्वजांना कावळ्याच्या शरीरात मृतांचा आत्मा जातो आणि मृताची इच्छा अपुरी राहिली असल्यास कावळा पिंडाला शिवत नाही असली बातारामी कथा सांगितली आणि तुमच्या पूर्वजांना ती पूर्णपणे पटली आणि मी एवढा कळवळून पुराव्याने, शास्त्रीय आधाराने शेतीमालाच्या भावाचे महत्त्व सांगतो आहे ते तुम्हाला पटायला किती त्रास पडतो आहे." गंमत अशी अजूनही ही गोष्ट कधी सांगितली तर आसपासच्या कार्यकर्त्यांपैकी सर्व, विज्ञानवाद मानला तरी कावळ्याच्या पिंडाला शिवण्यातील सत्याचा पुरस्कार करणारे निघतातच.

 संघटनेच्या प्रचारात आम्ही एक शिस्त पाळायचो. "शरद जोशी ब्राह्मण आहेत म्हणून आम्ही त्यांचे ऐकू नये असे तुम्ही म्हणता, मग पुढाऱ्यांहो! तुम्ही तर आमच्या जातीचे , रक्ताचे ना! मग शरद जोशींनी जे सत्य दोन वाक्यांत सांगितले, ते सांगायला तुमची थोबाडं काय उचकाटली होती?" हा खास आहेर माधवराव खंडेराव मोऱ्यांच्याच तोंडून यायचा. धर्मातील सर्व सणांची बांधणी आणि ब्राह्मणवर्गाने शेतकऱ्यांकडून धन उकळण्याकरिता केलेल्या योजनांचे वर्णन करण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची. जोतिबा फुल्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूडा'वर मी 'शतकाचा मुजरा' ही पुस्तिका लिहिली. त्यातील ब्राह्मणजातीवरील टीका वाचून अनेक ब्राह्मण माझ्यावर फार नाराज झाले.

 ते असे सारखे चालूच असते. मराठवाड्यातला कुणी पुढारी मला गोडशांची अवलाद

अंगारमळा । २०