ज्ञानदेवस्तव

विकिस्रोत कडून

श्रीविष्णुसा न तारी जन काय ज्ञानदेव वेगानें ?

हा दे, तें स्वर्गाच्या जनका, यज्ञा, न देववे गानें. ॥१॥


यास्तव, या स्तवनार्हा स्तवितों, कवि तों नव्हें, यथाबुद्धि.

स्तवितां भावें, देतो ज्ञानेश्वरविष्णु हा मन:शुद्धि. ॥२॥


ज्ञानेशा ! भगवंता ! भगवज्जनवल्लभा ! महासदया !

कलियुगवर्ती जन जो, देसी, स्मरणेंचि, मुक्तिचें पद या. ॥३॥


त्वन्नाम महामंत्र ज्ञानप्रद होय; यासि जो भावें

जपतो, ज्ञान तयाचें, त्या जनकाचें तसेंचि, शोभावें. ॥४॥


कोणा जडा न होसिल सुगतिप्रद जाहलासि भिंतीतें.

श्रीरामाचें तैसें, तव यश सज्जनसमाज चिंती तें. ॥५॥


ज्ञानेशा ! जें जाड्य, त्वत्तेजें क्षिप्र तें विरे; डाजो

खळमानसीं प्रताप; श्रुति वदला विप्र तेंवि रेडा जो. ॥६॥


श्रीमद्भगवद्गीताव्याख्या केली जगासि ताराया.

सारा या सद्ग्रंथा सेविति, संसारताप साराया. ॥७॥


श्रीहरिहरकीर्ति तशा बा ! विश्वास प्रिया तुझ्या ओव्या.

जो व्यास तोहि बहुधा म्हणतो, ‘ श्रुतिशाचि या मला होव्या. ’ ॥८॥


ज्ञाता शिष्यासि म्हणे, ‘ प्राकृत दिसतो, परंतु न तसा रे;

गोपप्रभुसा अमृतानुभव, तया पाहि सुजन नत सारे. ’ ॥९॥


ज्ञानेशा ! त्वत्कृतितें करिति ज्ञाते समस्तही प्रणती.

‘ ज्ञानेश्वरी भवानी होय महामोह महिष ’ हें म्हणती. ॥१०॥


शंकर निवृत्ति, हरि तूं ज्ञानेश, ब्रह्मदेव सोपान;

विद्या मुक्ता; तुमच्या कीर्तिसुधेचें सदा असो पान. ॥११॥


त्वां बहु जड उद्धरिले, प्रकट ज्ञानेश्वरा ! दयालो ! हें.

तारीं मयूरहि; तुला परिसासि हिनाविजे न या लोहें. ॥१२॥



हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.