अन्वयार्थ – २/एक दिवस असाही उगवतो

विकिस्रोत कडून


एक दिवस असाही उगवतो


 खादा दिवस असा उगवतो आणि एखादी घटना अशी घडते, की मनात गुपचूप दडून राहणारा, एरव्ही कोणालाही न जाणवणारा अहंकार पार उन्मळून पडावा.
 ६ एप्रिल २००१ रोजी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरविण्यात आला होता. हे स्टेडियम एशियाड खेळांच्या उद्घाटनासाठी बांधण्यात आले. लाखावर प्रेक्षक आरामात बसू शकतील अशी तेथील व्यवस्था आहे. एरव्ही ती जागा सभामेळाव्यांसाठी दिली जात नाही; खेळ विभागाच्या मंत्री उमा भारती यांनी मोठ्या सौजन्याने किसान समन्वय समितीच्या 'किसान कुंभा' साठी ही जागा देण्याचे मान्य केले; एक दिवसाचे भाडे, प्रसंगानुसार साडेतीन ते साडेसहा लाख रुपये आहे, गरीब शेतकरी संघटनेच्या खिशाला परवडेल इतक्या कमी दरात ती देऊ केली. आठवडाभर आधी जाऊन पाहिले, आनंदीआनंद वाटला.
 शेतकऱ्यांचा मेळावा म्हणजे बांबू, फळ्या वापरून उभा केलेला एक मंच, लाऊड स्पीकरची जेमतेम व्यवस्था आणि समोर शक्य तितक्या साफसूफ केलेल्या मैदानावर गच्च दाटीवाटीने बसलेली, कोणत्याही गैरसोयीबद्दल 'ब्र'सुद्धा न काढणारी आणि सारे प्राण कानांत आणून एकतानतेने भाषणे ऐकणारी शेतकरी स्त्रीपुरुष मंडळी. ६ एप्रिलचा 'किसान कुंभ' असा होणार नव्हता. सर्वांना बसायला खुर्च्या, नाही तर निदान बाक मिळणार होते. एवढ्या बाबीत का होई ना, शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या संघटनेच्या परिस्थितीत फरक झाला आहे या जाणिवेने खूप बरे वाटले.
 शेतकरी संघटनेच्या मेळाव्यांना मिळणाऱ्या प्रतिसादाचा उत्स्फूर्तपणा गळा दाटून आणणारा असतो. ४ एप्रिलच्या संध्याकाळीच दिल्लीमध्ये महाराष्ट्रातले 'ग्यानबा' आणि त्यांच्या 'लक्षुम्या' दिसू लागल्या. अनवाणी पाय, गाठीगाठीची
लुगडी, डोक्यावर भाकरीपासून सरपणापर्यंत प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे गाठोडे अशा अवतारातील शेतकऱ्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसू लागल्या. १९८० सालापासून असे महामेळावे वीसपंचवीस झाले. प्रत्येक वेळी ही सारी मंडळी कोणत्या भावनेने पेटून चूल बंद करून घराला कुलूप लावून शेतकरी संघटनेच्या सभांना यायला निघतात, शेकडो किलोमीटरचा प्रवास आगगाडीच्या डब्यात दाटीवाटीने बसून सारे काही सोसत करतात? हे मला अजून उमगलेले नाही; पण हे होते, प्रत्येक वेळी होते, न चुकता होते. संघटनेच्या प्रेमापोटी लोक हे करतात असे कोणी म्हटले तरी धन्य धन्य वाटते. ४ एप्रिलच्या रात्रीपासून टेलिफोनवर निरोप येऊ लागले - खांडव्यापासून ते आग्र्यामथुरेपर्यंत सर्व रेल्वे स्टेशनांचे फलाट लाल बिल्लावाल्या स्त्रीपुरुषांनी लगडून भरले आहेत; मंडळी थोडीफार तीर्थयात्रा करीत, प्रेक्षणीय स्थळे पाहत 'किसान कुंभा'साठी दिल्लीकडे निघाली आहेत. आकाशाला दोन बोटेसुद्धा पुरती न राहिल्याचा भास झाला.
 ६ एप्रिल उजाडला; मेळावा दुपारी एक वाजता सुरू व्हायचा होता. सकाळी उठून, पुंडलिकाच्या दर्शनाला आलेल्या या विठोबारखमायांचे दर्शन घेण्याकरिता मी स्टेडियमकडे गेलो. केवढे प्रचंड आवार ते! दोन फेऱ्या पुऱ्या घालणेसुद्धा आता प्रकृतीला झेपणे शक्य नाही. भोवतालचा हिरवळीचा सारा भाग लोकांनी फुलून गेला होता. सकाळच्या चहापाण्याच्या तयारीत सारे होते. कोठे न्याहरीसाठी दशम्या सुटत होत्या, कोठे कोठे लाकडे पेटवून चूल करण्याचा प्रयत्न चालू होता. स्टेडियम खेळांच्या सामन्यांसाठी आहे, त्यामुळे शेकडोंनी स्वच्छतागृहे आहेत - चांगली पांढऱ्या स्वच्छ फरशीची, भरपूर पाण्याचा पुरवठा असलेली. या व्यवस्थेचेच अनेकजण कौतुक करीत होते. सार्वजनिक स्वच्छतागृहात जाण्याच्या कल्पनेनेही माझ्या अंगावर काटा येतो. या साध्याभोळ्या जीवांची सुखाची माफक कल्पना पाहूनही डोळे ओलावले. समोरून एक, चिंध्यांचे पागोटे घातलेला म्हातारा माझ्याकडे धावत येऊ लागला; लोक त्याला अडवीत होते. 'मला भेटायचंय, भेटायचंय', असे ओरडत तो माझ्याजवळ येऊन पोहोचला; अक्षरशः गळ्यात मिठी घालून ओक्साबोक्शी रडू लागला. "साहेब, भाई धारिया गेले; सुभाष जोशी आता आपल्यातले राहिले नाहीत, पण त्यांना निरोप देऊन निपाणी भागातून मी एकटा आलो." काहीसा अभिमान, काही आक्रोश आणि प्रचंड आनंद अशा मिश्र स्वरात तो बोलत होता. १९८० मध्ये विडीतंबाखूच्या भावासाठी निपाणीच्या रस्त्यावर आम्ही चाळीस हजार शेतकरी २३ दिवस रस्ता रोखून बसलो होतो. २३व्या दिवशी दसरा होता, तो
आंदोलननगरातच गुढ्या उभारून साजरा करण्यात आला आणि २४व्या दिवशी याच ६ एप्रिलला पहाटे एस.आर.पी.चे लोक आले होते. मला पकडून दूर नेल्यानंतर त्यांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात बारा शेतकरी जागीच ठार झाले होते. त्या घनघोर आंदोलनात या म्हाताऱ्याने मला पाहिले असणार, कधीतरी भाकरी वाटून खाल्ली असणार, एकत्र पेज प्यायली असणार; या सगळ्या आठवणींनी त्याचे प्राण फुटू पाहत होते.
 पंचवीस वर्षापूर्वी स्वित्झर्लंडमधील जीवनाला रामराम ठोकून मी परत आलो. त्यानंतर किती सभा, किती बैठका; किती हजार मैलांचे प्रवास, किती तुरुंग आणि मनाला घरे पाडणारे कितीतरी अनुभव. या साऱ्यांच्या वेदना, लोकांचे हे प्रेम पाहिले म्हणजे बुजून जातात. कोण हे शेतकरी? कोण मी? मी ना यांच्या जातीचा, ना रक्ताचा. आजपर्यंत थोड्या का धुरीणांनी शेतकऱ्यांच्या कामासाठी जीव ओवाळून टाकले? पण त्यांतील बहुतेक 'नाही चिरा नाही पणती' असे उपेक्षेत इहलोक सोडून गेले. इतर दुर्भाग्य काही असो, लोकांचे प्रेम मिळण्याबाबतमात्र आपल्याला लॉटरी लागली आहे याची जाणीव झाली. लॉटरी लागण्याचा अभिमान तो काय असायचा? पण, मनात अहंकार अंकुरला, हे खरे!
 दुपारी बरोबर एक वाजता सभेला सुरुवात झाली. दिल्ली म्हणजे प्रचंड अंतरांचे शहर. येथे कोठूनही काहीही जवळ अंतरावर म्हणून नाही. पन्नासशंभर किलोमीटरमध्ये फारशी शेतीही नाही. शेतकरी मेळाव्यांत निम्मीअधिक गर्दी शंभर किलोमीटरच्या अंतरावरून येणाऱ्या शेतकऱ्यांचीच असते; येथे असे फारसे कोणी नाहीच. हरियानामध्ये गव्हाची कापणी चालू झालेली, त्यात पुष्कळ लोक अडकलेले. चौधरी देवीलाल अपोलो इस्पितळात शेवटच्या घटका मोजीत असल्याची बातमी पसरली, त्याचाही हरियानाच्या उपस्थितीवर परिणाम झालाच. मुख्य गर्दी आली ती महाराष्ट्र आणि गुजराथेतून. दोनतृतीयांश महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत. आदल्या दिवशी नागपूर भागात गारांचा पाऊस झाला. गुजराथवरही एकामागून एक संकटे कोसळत आहेत; पण या दोन राज्यांतील शेतकऱ्यांनी मैदान सारे भरून टाकले.
 राज्याराज्यांतील मान्यवर नेत्यांची भाषणे झाली. 'किसान कुंभा'त जमलेल्या साऱ्या संघटना या पहिल्यापासून खुल्या व्यवस्थेचा पाठपुरावा करणाऱ्या. 'एका दाण्यातून शंभर दाणे तयार करणारा शेतकरी स्वतः दरिद्री राहतो, कारण सरकारी व्यवस्थेची बाजारपेठेतील लुडबूड' हा त्यांचा मूलभूत सिद्धांत;
'शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण', 'सूट सबसिडीचे नाही काम, आम्ही घेऊ घामाचे दाम' या त्यांच्या घोषणा. जागतिक व्यापार संस्थेच्या विवादाचे रान चारी बाजूस पेटले आहे. बहुतेक मातबर मंडळी 'WTOमुळे आता शेतकऱ्यांचे वाटोळे होणार' म्हणून गळा काढीत आहेत. 'किसान कुंभा'त जमलेल्या ५५ संघटनांची भूमिका अगदी वेगळी. 'सरकारी व्यवस्थेच्या दंडबेड्या आमच्या हातापायांतून निघू द्या; आम्ही जगाशी सामना करून दाखवितो' अशा निर्धाराने ते एकत्र आलेले. 'संरक्षण कसले देता, हत्यार द्या' ही त्यांची मागणी. साऱ्या नेत्यांनी शेतकऱ्याच्या उगवणाऱ्या स्वातंत्र्याच्या पहाटेचे स्वागत केले, वेगवेगळ्या बहकाव्यांखाली येऊन WTOला अपशकुन करणाऱ्या घुबडांचा निषेध केला आणि शरद जोशी सांगतील तो कार्यक्रम अमलात आणू अशा शपथा निक्षून घेतल्या.
 कार्यक्रम काय देणार? सोपाच दिला. जवान सरहद्दीवर लढतो, किसान देशाची ही लढाई शेतात लढायला सज्ज झाला आहे. कारगिलमध्ये लढणाऱ्या जवानाच्या घरी, वीजबिल भरले नाही किंवा कर्जफेड केली नाही म्हणून अधिकारी जाऊन त्रास देऊ लागले तर जवानाची हिंमत टिकावी कशी? देणे देता येत नाही म्हणून शेतकऱ्यावर विष खाऊन आत्महत्या करण्याची पाळी येत असेल तर किसानांनी जागतिक व्यापारपेठेशी लढाई लढावी कशी? कोणतीच देणी न देण्याचा कार्यक्रम ठरला, साऱ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. कुंभ संपला, पत्रकार परिषदा झाल्या, मुलाखती झाल्या. संघटनेच्या सभेत डझनावर TV कॅमेरे आजपर्यंत पाहिले नव्हते. खात्री पटली - नागपुरात मेळावे झाले, सांगलीला झाले, नांदेडमध्ये झाले, औरंगाबादला झाले; महाराष्ट्राबाहेर बातम्या फारशा गेल्या नाहीत- आता असे होणे शक्य नाही; मेळावा खुद्द राजधानी दिल्लीत भरला आहे, झाडून सारे पत्रकार हजर आहेत तेव्हा 'भारतातील शेतकरी स्वातंत्र्याला घाबरत नाहीत. जगाशी टक्कर द्यायला सज्ज आहेत' ही घोषणा जगभर पोहोचेल याची खात्री वाटली.
 कधी नव्हे ते कुंभात झालेले विचारमंथन मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांत छापून पत्रकारांच्या हाती दिले होते. फुलून भरलेले स्टेडियम लोकांच्या उत्साहाचा सज्जड पुरावा देत होते. आता काही गफलत होण्याची शक्यताच राहिली नव्हती. संध्याकाळी चौधरी देवीलाल यांच्या मृत्युची बातमी आली, कुंभाची बातमी TVवर थोडी मागे सरकली.
 कृतकृत्य वाटत ६ एप्रिलच्या रात्री झोपायला गेलो. ७ एप्रिल रोजी सकाळच्या
वर्तमानपत्रांचा ढीग आला. पहिल्या पानावरील महत्त्वाची जागा चौधरींसाठी गेली. आतल्या पानावर, इंग्रजी वर्तमानपत्रांत, अगदी गुलाबी कागदावर छापल्या जाणाऱ्या अर्थशास्त्रीय वर्तमानपत्रांतही कुंभाचा मुख्य गोषवारा व्यवस्थित दिला होता. जमलेल्या गर्दीचे आणि मंचाचेही चांगले मोठे फोटो छापून आले होते. कुतूहलाने फोटोखालील ठळक टाईपातील मजकूर वाचला आणि टंच फुगलेल्या फुग्याला टाचणी लागावी तशी अवस्था झाली. विश्वसनीयतेकरिता विख्यात असलेल्या वर्तमानपत्रांतही फोटोखाली 'किसान कुंभ खुलिकरणाला आणि WTOला विरोध करण्याकरिता भरला होता' असे चक्क छापले होते. काय म्हणावे या कर्माला? कपाळाला हात लावून बसलो. हे असे घडलेच कसे? खुलासा देणारे पत्रक काढले, टेलिफोनवर वेगवेगळ्या वर्तमानपत्रांशी संपर्क साधला. तथ्य निघाले ते एवढेच, की असोसिएटेड प्रेसचा कोणी कॅमेरावाला कुंभाच्या वेळी हजर होता, त्याने फोटो काढले. आपलाआपला स्वतंत्र फोटोग्राफर प्रत्येक ठिकाणी पाठविण्याऐवजी अशा व्यावसायिक छायाचित्रकाराने काढलेला फोटो बहुतेक वर्तमानपत्रे विकत घेतात. कॅमेरावाले भाषण कसले ऐकतात आणि दिलेल्या पुस्तिका कसल्या वाचतात! शेतकरी जमले म्हणजे ते WTOचा विरोध करण्याकरिताच असणार अशी त्यांची त्यांच्या डाव्या बुद्धीतून झालेली खात्री. त्यांनी फोटोंच्या मागे 'WTO विरोधी मेळावा' असल्याचे लिहून टाकले आणि हजारो कार्यकर्त्यांच्या दिवसांच्या नव्हे, वर्षानुवर्षांच्या परिश्रमाला तडा पाडला.
 दुःखात सुखाची गोष्ट बरी, की महाराष्ट्रातील बहुतेक वर्तमानपत्रांनी कोणताही गोंधळ घातला नाही. हिंदी वर्तमानपत्रांतील बातम्याही व्यवस्थित आहेत. तोंडघशी पडली ती फक्त उच्चभ्रू, गुलाबी पृष्ठांची इंग्रजी वृत्तपत्रे आणि त्यांचे वाचक.
 एक दिवस असा उगवतो, एक घटना अशी घडते, की साऱ्या अहंकाराचा फुगा फुटावा. घटना लहानशी; पण साऱ्या आयुष्याच्या परिश्रमाविषयी प्रश्नचिह्न उभे करणारी!

दि. २१/४/२००१
■ ■