पान:लोकहितवादींची शतपत्रे.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१५०: शतपत्रे

 असे एकमेकांचे सोईकरिता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे चार वर्ण प्राचीन काळी उत्पन्न झाले; तेव्हा प्रत्येक लबाडी करू लागले. म्हणून प्रत्येक वर्णाने कसे वागावे, याचा निर्बंध होण्याकरिता कोणी शास्त्र लिहिले, त्याजवरून त्याचा बंदोबस्त करू लागले; परंतु शास्त्रासही लोक मानीनात. तेव्हा राजास नेमणे जरूर झाले. आणि राजाच्यानेही कारभार नीट चालेना, म्हणून राजाने कसे चालावे इत्यादीसंबंधी राजनीती झाली व क्रमाक्रमाने राजाचे अमलदार, मंत्री, प्रधान आणि सैन्य हे त्याचे ताब्यात लोकांचे सुखाकरिता आले.
 पुढे दाणे घरोघर पोचवावयाचे अडचण पडू लागली, म्हणून सुवर्ण व रुपे या धातू बहुतमेहनतीने तयार होतात, त्याचे तुकडे करून ते द्रव्य चालू लागले. येणेकरून अशी सोय झाली की, ज्या ठिकाणी आपल्यास काही खरेदी करावयाचे असेल, तेथे ते तुकडे घेऊन गेले म्हणजे त्याचे बदला जो पाहिजे तो जिन्नस मिळावा. घरोघर गाड्यांवर घालून दाणे नेणे जरूर नाही. पुढे हे सोन्याचे तुकडे लोक खोटे करून आणू लागले. तेव्हा राजाने वरती शिक्का करावा असे ठरले; तेव्हा रुपये व मोहरा चालू झाल्या. याप्रमाणे धर्मशास्त्रे व नीतिशास्त्राचे मूळ आहे.
 ईश्वराने विचार दिला आहे, तेणेकरून जे वाईट दिसले, ते सर्वसंमतीने काढून टाकले व जे चांगले होते, ते ग्रहण केले. शास्त्र लोकांचे सुखाकरिता केले आहे. शास्त्राचा मुख्य हेतू हाच आहे की, लोकांमध्ये व्यवस्था व्हावी, ज्याचे त्यांस मिळावे. कोणाची जबरी कोणावर होऊ नये. मालकी कायम रहावी. प्रजेने नीट वागावे. राजाने प्रजेचे सुखावर नजर देऊन वसूल घ्यावा; जास्ती घेऊ नये. व खर्च बेताने करावा. कारण लोकांचे मेहनतीचा पैसा घेऊन राजाने आपले सुखाकरिता व हिताकरिता व डामडौलाकरिता निरर्थक शिपाई व अंमलदार बाळगणे यांजकडे खर्च करणे उचित नाही; व अयोग्य मनुष्यास कामावर न ठेवणे हाही राजाचा मुख्य धर्म होय, तर धर्म म्हणजे नियम लोकांकरिता केले आहेत ते व जी आपली योग्यता त्या योग्यतेप्रमाणे व्यापार करणे म्हणजे ब्राह्मण असल्यास विद्या व शूद्र असल्यास कृषिकर्म करणे हाच धर्म आहे. याप्रमाणे बरोबर चालून प्रतारणा न करणे व कोणास दुःख न देणे हा मुख्यार्थ आहे. आणि धर्माचे मूळ व शास्त्राचे मूळ विचाराने हेच कळते.

♦ ♦