Jump to content

पान:पायवाट (Payvat).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 जनावरांची दुःखे त्यांच्या देहाच्या गरजांनी निर्माण केलेली असतात. सुधारणा आणि संस्कृती या दुःखांच्यावर उपाय शोधून काढू शकतील. पण जर माणसांची दुःखे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमधूनच निर्माण होत असतील तर हा कलह मन व्यापक केल्यामुळे तरी कधी संपणारा आहे की नाही कोण जाणे! या पातळीवर चिंतन करणाऱ्या मनाची झेप स्वाभाविकपणेच मोठी असणार. मग केशवसुतांना अशावेळी वेदकाळच्या ऋपिवयांशी आपला सांधा जुळला आहे असे वाटू लागते. या पातळीवर सर्व मानवाचे आपण प्रतिनिधी होत आहोत, हेही त्यांना जाणवते. तेजाचे पंख हेलावत जाणारी शक्ती त्यांना खुणावू लागते. तिचा देव्हारा आपल्या अंतःकरणात स्थापन केला जातो असे त्यांना वाटू लागते. वेदकाळच्या ऋषींशी आपला सांधा जुळला आहे हे जाणवले, म्हणजे काळाचा दुरावा संपूनच जातो. पण तरीही हा तटस्थ काळ शेजारी आपले अस्तित्व जाणून उभा आहे. आला क्षण, गेला क्षण असे सांगून हा काळ स्वतःचे अस्तित्व घोषित करतो.
 जीवनातल्या सर्व सुखांना हा काळ उपकारक होत नाही. तो कोणत्याही दुःखाचा वाटेकरी होत नाही. सर्व सुखदुःखांना अत्यंत निष्ठुरपणे 'आला क्षण गेला क्षण' एवढे एकच उत्तर काळ देत असतो. या पातळीवर केशवसुतांना सारे धैर्य एकवटून अज्ञाताच्या प्रदेशात उड्डाण करावेसे वाटू लागते. जे ज्ञात आहे त्याच्या कक्षा विस्तारून अज्ञाताचा काही प्रदेश ज्ञाताच्या कक्षेत आणावा; तो शेतीखाली, वहिवाटीखाली आणावा असे वाटू लागते. हे आपणाला जमेल की नाही याची शंका इथेही आहेच. त्या अज्ञाताच्या प्रदेशात मुक्काम ठोकणारा सनदी शेतकरी एखादाच असू शकेल. पण या अज्ञाताच्या कक्षेतून एखादी वनमाला, एखादे फूल ज्ञाताच्या प्रदेशात उचलून आणता येईल काय, याची वेहोषी केशवसुतांना चढते. या धुंद क्षणी त्यांना अस्पष्टपणे सृष्टीचे रहस्य दिसू लागते. या रहस्याशी असणारे सत्य व सौंदर्याचे संबंध दिसू लागतात. 'झपूर्झ' आणि 'हरपले श्रेय' ही अशी मराठी कवितेला अज्ञात असणाऱ्या प्रदेशातून केशवसुतांनी खुडून आणलेली, शतकभर अम्लान राहणारी फुले आहेत असे मला वाटते. आणि या संदर्भात कलावंत म्हणून केशवसुतांचे मोठेपण जाणवू लागते.
 मराठी कवितेचा विकास होत आहे असे आपण म्हणतो; एका मर्यादित अर्थाने हे म्हणणे खरेही आहे. जी निसर्गकविता केशवसुतांनी लिहिली, किंवा जी प्रेमकविता केशवसुतांनी लिहिली, त्याच्या कितीतरी पुढे मराठी कविता आज निघून गेली आहे. काव्याच्या रचनेचे जे प्रयोग केशवसुतांनी केले, त्याही पुढे घाटाबाबतची प्रयोगशीलता गेलेली आहे. पण 'झपूर्झ' आणि 'हरपले श्रेय' यांच्यापुढे मराठी कविता गेलेली आहे काय ? या प्रश्नाचे उत्तर देताना थोडे जपूनच बोलले पाहिजे. या अर्थाने काव्याच्या प्रवाहात एखादी कलाकृती असे स्वरूप धारण करते की त्या स्वरूपातच ती आकृती परिपूर्ण होऊन थांबतं असे मानावे लागते.

 शेवटी हा पाहण्या-पाहण्यातला फरक आहे. काव्य म्हणून यशस्वी नसलेल्या पण

८६ पायवाट