Jump to content

पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अवनतीची मीमांसा । ५९

चक्रनेमिक्रम
 भारताच्या अवनतीचें प्राचीनत्व हें जें दुसरें कारण विष्णुशास्त्री यांनी सांगितलें आहे त्यांतहि असाच हेत्वाभास आहे. एक विस्तीर्णत्व भूगोलावरचें आहे तर दुसरें कालपटावरचें आहे इतकेंच. हिंदुस्थानचा इतिहास चार-पांच हजार वर्षांचा आहे. तेव्हा एवढ्या काळानंतर त्याला थकवा येऊन त्यामुळे ऱ्हासकाळ आला असला तर त्यांत नवल कसले ? दीर्घकालीन प्रगतीनंतर रोमन साम्राज्य ऱ्हास पावलें, मिसर देशाला अवकळा आली, आणि आणखी दोन-तीन हजार वर्षांनी इंग्लंडचें तेंच होणार आहे, असें विष्णुशास्त्री म्हणतात. कालौघांत असेच चालावयाचें. मनुष्य कितीहि बलवान असला तरी केव्हा तरी तो थकणारच. त्याचप्रमाणे राष्ट्रांचें आहे. उत्पत्ति, स्थिति व लय हें अवस्थात्रय जसें व्यक्तिभूत मनुष्यास टळत नाही तसेंच राष्ट्राला टळणार नाही; असें असतांना हिंदुस्थानाला आज जर लयावस्था प्राप्त झाली असली तर ती आमच्या नैसर्गिक मूर्खपणामुळे आली, आमच्या धर्मविकृतीमुळे, जातिभेदामुळे, विद्याविमुखतेमुळे आली असें म्हणण्याचे काय कारण? हा चक्रनेमिक्रम आहे ! कधी उन्नति, कधी अवनति हें चालावयाचेंच !. समाजाचे अवगुण त्याला जबाबदार आहेत असें म्हणतां येणार नाही.
हा दैववाद
 विष्णुशास्त्री यांनी मांडलेला हा युक्तिवाद त्यांना स्वतःलाच मान्य होता असे दिसत नाही. कालगतीनेच जर सर्व होणार असेल तर मग देशाच्या उन्नतीचे उपाय समजाला सांगण्याचें प्रयोजन तरी काय ? मग प्रयत्नवादाला अर्थ तरी काय ? प्रारब्धवाद, कर्मवाद, यापेक्षा निराळा काय असतो ? दैववाद, प्रारब्धवाद तो हाच. विष्णुशास्त्री तो क्षणभर तरी मान्य करतील काय ? तसें असतें तर इंग्रजी विद्येचें वज्र हातीं घ्या, असें त्यांनी सांगितलें नसतें. मराठी भाषेचा अभिमान धरून नव्या विद्वानांनी ग्रंथ लिहावे असा अट्टाहास केला नसता. देशाभिमानाचा परिपोष करावा, त्या थोरल्या नात्यांत अठरापगड जातींची लहान नातीं. विलीन करावी, असा उपदेश केला नसता. आमच्या राजेरजवाड्यांनी, धनिकांनी संपत्तीचा उपयोग करतांना युरोपीय लोकांचा कित्ता घ्यावा, असें म्हटलें नसतें. भुतेंखेतें, शकुन- अपशकुन, फलज्योतिष असल्या लोकभ्रमांतून समाजाला मुक्त करण्यासाठी लेख लिहिले नसते. विष्णुशास्त्री दैववादी असते तर वरील लोकभ्रमांचा, विशेषतः फलज्योतिषाचा त्यांनी पुरस्कार केला असता; पण त्याचा निषेध करून ग्रहज्योतिष- खरें ज्योतिषशास्त्र व इतर सृष्टिशास्त्रे यांचा न्यूटन, गॅलिलिओ, केप्लर यांच्याप्रमाणे अखंड अभ्यास आपण करावा, असा आग्रह ते करतात. यावरून प्रारब्धवाद त्यांना स्वप्नांतहि मान्य होण्याचा संभव नव्हता हें उघड आहे.,
 चक्रनेमिक्रमाप्रमाणेच उन्नति-अवनति होत असते असें जर खरेंच त्यांच्या मनांत असतें, तर त्यांनी उन्नतीचे उपाय जसे सांगितले नसते तशीच अवनतीची