पान:केसरीची त्रिमूर्ति.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२२ । केसरीची त्रिमूर्ति

प्रत्येक समाज आपल्या भाषेचा असा अभिमान बाळगीत आला आहे, हें जाणूनच विष्णुशास्त्री यांनी स्वभाषाभिमान चेतविण्यापासून आपल्या लेखनास प्रारंभ केला.
 'मराठी भाषेची सांप्रतची स्थिति' हा निबंधमालेतील पहिला निबंध. त्याच्या प्रारंभीच त्यांनी म्हटले आहे की, भाषेची अभिवृद्धि ही देशाच्या उत्कर्षाचें एक मोठेंच साधन आहे. कारण देश व भाषा यांची एकच अवस्था मानली तरी चिंता नाही. म्हणजे अस्मितेचीं हीं दोन अंगें अविभाज्य आहेत. अशा या महत्त्वाच्या अंगाची– स्वभाषेची- इंग्रजीच्या वर्चस्वामुळे अवहेलना होत आहे हें पाहून विष्णुशास्त्री अस्वस्थ झाले आणि त्या भाषेचें वैभव महाराष्ट्रियांच्या निदर्शनास आणून देण्याचें कार्य त्यांनी आरंभले. सर्व प्रकारचे विकार, विचार, भावना, कल्पना, नाना आंतरिक संवेदना, अभिप्राय हे व्यक्त करण्यास मराठी भाषा असमर्थ आहे, तींत तसे समर्पक, अर्थव्यंजक शब्दच नाहीत असा एक आक्षेप त्या वेळी घेतला जात असे; आणि हा आक्षेप नव्या पदवीधरांकडून, सुशिक्षितांकडून येत असे. (आश्चर्यं असें की, आज शंभर वर्षांनंतरहि महाराष्ट्रांतले अनेक लेखक मराठी लिहितांना बिनदिक्कत मधेच अनेक इंग्रजी शब्द वापरतांना दिसतात. सर्व भावार्थ व्यक्त करण्यास मराठी समर्थ आहे हें आजहि त्यांना मान्य नाही.) त्याला उत्तर देतांना शास्त्रीबुवा म्हणतात, "जी भाषा बोलणाऱ्यांनी दिल्ली-अटकेपर्यंत आपले झेंडे नेऊन लावले, जींत तुकाराम-रामदासांसारख्या भगवत्परायण साधूंनी आपले श्रुतिवंद्य अर्थ ग्रथित केले, जीस मुक्तेश्वर, वामनपंडित, मोरोपंत इत्यादि कवींनी आपल्या रसाळ व प्रासादिक वाणीने संस्कृत भाषेचीच प्रौढी आणली, त्या भाषेस आवेश, गांभीर्य व सरसता या गुणांकरिता कोणत्याहि अन्य भाषेच्या तोंडाकडे पाहण्याची खास गरज नाही, अशी आमची खात्री आहे."
 स्वभाषा व स्वदेश हीं अस्मितेचीं अंगें अविभाज्य आहेत म्हणजे काय, हें यावरून स्पष्ट होईल. ज्या लोकांच्या ठायीं कर्तृत्व आहे, पराक्रम आहे त्यांची भाषा समृद्ध असणारच; आणि भाषेच्या विकासामुळे कर्तृत्वाचा विकास साधणारच, असा हा अन्योन्य संबंध आहे. हा दुसरा विचार मनांत असल्यामुळेच विष्णुशास्त्री यांनी म्हटलें आहे की, "इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाही. हें तर काय, पण आपल्या मराठीच्या उत्कर्षास तीमोठेच साधन होईल अशी आमची खात्री आहे. सर्व जगांतील ज्ञानभांडार तींत साठविलें असल्यामुळे तिचें साहाय्य मराठीसारख्या पक्व होऊ पाहणाऱ्या भाषेस होईल तितके थोडें आहे. इतकेंच मात्र की, तें ज्ञानभांडार खुद्द आपलेसे करून घेण्यास आपल्या भाषेचें स्वत्व म्हणजे निराळेंपण कायम राखलें पाहिजे. तर मराठी भाषेच्या हितकर्त्या विद्वानांनी हें पक्के लक्षांत वागवावें की, इंग्रजीतील केवळ अर्थ मात्र घेऊन त्यास शुद्ध मराठीच्या साच्यांत त्यांनी ओतलें पाहिजे. अशा तऱ्हेचे ग्रंथ बनले असतां ते भाषेस फारच हितावह होऊन भूषणप्रद होतील."