[ ७९
कंपनीचे चालक मला म्हणत. पण या म्हणण्याच्या परीक्षेची वेळ न आलेलीच बरी असें मला वाटे ! महाराष्ट्र नाटक मंडळीचेंहि असेंच म्हणणें असे. पण कंपनीने रा. खाडिलकर यांचा व रा. खाडिलकर यांनी कंपनीचा असा दुतर्फी जवळ जवळ मक्ताच ठरल्यासारखा झाला असल्याने, त्यांत दुसन्याला खरोखरच वाव नाहीं हें अुघड दिसण्यासारखें होतें. कसेंहि असो. आपण होअून कोणाला नाटक देणें व करा म्हणणें हा प्रसंगच सहसा मीं येअूं दिला नाही किंवा आला नाही ही गोष्ट खरी.
(६५) पण १९१२ सालीं महाराष्ट्र नाटक मंडळींत फूट झाल्याने, खाडिलकरांच्या मक्तेदारीचे दिवस संपले. महाराष्ट्र नाटक मंडळींतून कांही लोक बाहेर पडून त्यांनी भारत नाटक मंडळी या नांवाची अेक नवी मंडळी काढली व मजजवळ नाटक लिहून मागण्यासंबंधी जवळ जवळ धरणेंच धरलें. कर्मधर्मसंयोगाने याच सुमारास, कै. रावबहादुर दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी त्यांना मिळालेले तोतयासंबंधाचे कागदपत्र मला वाचण्यास दिले होते, व ते वाचून हा विषय अेखाद्या नाटकाला फार चांगला होअील असें माझ्या मनांत सहज येअून गेलें होतें. म्हणून अेक दिवस अेखादा प्रवेश लिहावा म्हणून बसलों. आणि पार्वतीबाअी पूजा करीत बसली असतां तिजपाशीं बगंभट हा नाना फडणिसाची निंदा करतो तो ' तोतयाच्या बंडा' तील प्रवेश लिहिला. तो माझा मला चांगला वाटला. आणि लिहिण्याची अेकदा जी घडी बसली ती अशी कांही बसली की, अवघ्या दहा दिवसांत माझे सुमारें चार सवाचार अंक ओळीने लिहून झाले. अेक प्रकारें तो नादच लागला, केसरी ऑफिसांत जाअून सकाळी अकरा साडेअकरा वाजेपर्यंत वर्तमानपत्राचा मजकूर लिहावा, आणि दोन प्रहरापासून रात्रीपर्यंत घरी नाटक लिहीत बसावें, असा प्रकार सुरू झाला तो दहा दिवस अबाधित टिकला. तीन साडेतीन अंक होतांच नाटकाच्या कथानकाची चढण संपून अुतार लागला. आणि पुढचा भाग हस्तगत होणें हें अगदी सोपे आहे असें दिसून येतांच अेक संपूर्ण नाटक आपल्या हातून लिहून होणार याचा किती आनंद वाटला तो सांगतां येत नाही.
(६६) भारत नाटक मंडळीचे चालक हे पाळतीवर होतेच. त्यांना