श्रीकृष्णाची भूपाळी
| ←= | श्रीकृष्णाची भूपाळी |
भूपाळी १ [संपादन]
ऊठिं गोपालजी जाइं धेनुंकडे ।
पाहती सौगडे वाट तूझी ॥ ध्रु. ॥
लोपली हे निशी मंद झाला शशी ।
मुनीजन मानसीं ध्याति तुजला ॥ १ ॥
भानु-उदयाचळीं तेज पुंजाळलें ।
विकसती कमळें उदकावरी ॥ २ ॥
धेनुवत्सें तुला बाहती माधवा ।
ऊठिं गा यादवा उशिर झाला ॥ ३ ॥
ऊठिं पुरुशोत्तमा वाट पाहे रमा ।
दाविं मुखचंद्रमा सकळिकांसी ॥ ४ ॥
कनकपात्रांतरी दीपरत्नें बरी ।
ओंवाळिती सुंदर तूजलागीं ॥ ५ ॥
जन्मजन्मांतरीं दास होऊं हरी ।
बोलती वैखरी भक्त तुझे ॥ ६ ॥
कृष्णकेशव करीं चरणांबुज धरी ।
ऊठिं गा श्रीहरी मायबापा ॥ ७ ॥
==भूपाळी २==
जाग रे जाग बापा ।
विश्र्वपालका कृष्णा ।
दीन आम्ही उभे द्वारी ।
आमुची बोळवीं तृष्णा ॥ ध्रु. ॥
त्रासलो प्रपंची या ।
बहु कष्टलों भारी ।
म्हणवूनि शरण आलों ।
विभो तुझिया द्वारीं ॥ जाग. ॥ १ ॥
सांग बा न्यून काय ।
हरि तुझिया भांडारीं ।
याचक भीक मागे ।
प्रेम दीई झडकरी ॥ जाग. ॥ २ ॥
गुरुकृपे उदयो झाला ।
हरि उदया आला ।
सुख ते काय सांगूं ।
जिवलग भेटला ॥ जाग. ॥ ३ ॥
श्रीगुरुनाथराया ।
कृपासिंधु गोविंदा ।
देवनाथ प्रार्थिताहे ।
प्रभुपदारविंदा ॥ जाग. ॥ ४ ॥
| हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५२ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |