Jump to content

पान:सामाजिक विकासवेध (Samajik Vikasvedh).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रोजगार वाढीकडे लक्ष केंद्रित करण्याचे धोरण निश्चित केले असून तो या धोरणाचा गाभाघटक आहे.
 आरोग्य हा सामाजिक सुरक्षेचा महत्त्वाचा घटक असल्याने आरोग्य सुविधा वाढीबरोबर आरोग्यक्षम सवयी युवकांत वाढीस लागाव्यात म्हणून विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. व्यसन, एड्स, हृदयरोग, मधुमेह, क्षय, कर्करोगाचे युवकांतील वाढते प्रमाण हा या धोरणातील चिंतेचा विषय म्हणून अधोरेखित करण्यात आला आहे. त्यानुसार उपचारांबरोबर प्रतिबंधाकडे लक्ष पुरविण्याचे निश्चित केले गेले आहे. क्रीडा क्षेत्र विकास हा समर्थ व सुदृढ युवा पिढी निर्मितीचा कार्यक्रम बनविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. युवकांत मूल्यनिष्ठा वाढीकडे खास लक्ष पुरविले जाणार आहे. भारतात जात, धर्म, भाषा, वंश, प्रांत, परंपरा, संस्कृतींचे वैविध्य आहे. या पार्श्वभूमीवर युवकांत दया, क्षमा, शांती, अहिंसा असणे आवश्यक नाही तर अनिवार्य झाले आहे. भारतीय घटनेनुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, विज्ञाननिष्ठा यां मूल्यांना असाधारण महत्त्व आहे. शिवाय ते युवकांवर बंधनकारकही आहे, हे लक्षात घेऊन अभ्यास, उपक्रम, इत्यादींची पुनर्रचना करण्याचे धोरण स्वीकृत केले आहे. युवकांची सामाजिक बांधीलकी व त्यांचा समाजसहभाग कसा वाढेल या दृष्टीने विविध उपक्रम, कार्यक्रम भविष्यात योजले जाणार आहेत. प्रशासन व राजकारणातील युवकांची सक्रियता व सहभागावर दिलेला भर या धोरणाचे व्यवच्छेदक असे लक्ष्य आहे. त्यामागे भारताचा वर्तमान लज्जास्पद चेहरा बदलून त्याजागी पारदर्शी प्रशासन व भ्रष्टाचारमुक्त राजकारण तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम आहे. हे वर्तमान युवा पिढीपुढील खरे आव्हान असून ती ते कसे पेलते यावरच भारताचे चरित्र उद्या निश्चित होणार आहे. युवाशक्ती सबलीकरणाचे विविध कार्यक्रम ‘युवा धोरण - २०१४ मध्ये सुचविण्यात आले असून त्यांच्या कार्यक्रम अंमलबजावणीवर उद्याच्या भारताचे भविष्य आणि भवितव्य अवलंबून आहे. युवकांचे सामाजिक आणि आर्थिक समावेशन करण्याच्या उद्देशाने वंचित, उपेक्षित युवक विकास, शिक्षणमानाची सरासरी वाढविणे, संस्थाश्रमी, अनाथ, निराधार युवकांचे पुनर्वसन, उद्योजकता विकास, सेवायोजन इत्यादी गोष्टींना या धोरणात दिलेले महत्त्व म्हणजे सामाजिक न्यायाची वंचितांना दिलेली हमीच म्हणायला हवी.

 आज केंद्र शासन प्रत्येक युवकामागे रु. २७१० खर्च करते. शिवाय अन्य माध्यमातून ११०० रुपये युवकांवर दरडोई खर्च होत असतो. भविष्यकाळात युवा वर्ग देशविकासाचे केंद्र बनविले जाऊन युवा विकास

सामाजिक विकासवेध/७२